शिवसेना खासदार रवींद्र वायकर Pudhari File Photo
पालघर

Dadar Ratnagiri passenger train : दादर-रत्नागिरी पॅसेंजर आता धावणार वसईमार्गे

खा. रवींद्र वायकरांची माहिती : संसदेतही गाजला होता प्रश्न

पुढारी वृत्तसेवा

वसई : कोरोना काळापासून बंद असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात होती. मात्र, खासदार रवींद्र वायकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या गाडीचा विस्तार दादरपर्यंत करण्याऐवजी ती आता थेट वसईमार्गे चालवली जाणार आहे.

भविष्यात सर्वच कोकण रेल्वेचा मार्ग बदलण्यात येणार असून, रेल्वेच्या या नव्या नियोजनानुसार, कोकणामध्ये जाणाऱ्या गाड्या आता पश्चिम रेल्वे मार्गावरील जोगेश्वरी जंक्शनवरून सुटून बोरिवलीमार्गे जुचंद्र, कामण रोड, खारबाव, डुंगे, भिवंडी रोड, नवी डोंबिवली, कोपर, नांदवली, तळोजे आणि कळंबोली या मार्गाने पनवेलला पोहोचतील आणि तिथून पुढे या गाड्या कोकणाच्या दिशेने धावतील.

कोरोना काळात दादर-रत्नागिरी गाडी बंद करण्यात आली होती. ही गाडी आता फक्त दिवा स्थानकापर्यंत चालवली जाते. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिवा स्थानक गाठावे लागत होते. पण, मुंबईतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिवा सोयीचे नसल्यामुळे दिवा-रत्नागिरी गाडीचा विस्तार दादर किंवा सीएसएमटी स्थानकापर्यंत करण्यात यावा, अशी मागणी केली जात होती. तसेच यावरून राजकीय वाद देखील निर्माण झाला होता. मनसे पक्षाने याविरोधात आवाज उठवल्यानंतर शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार रवींद्र वायकर यांनी बुधवारी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली.

या भेटीनंतर त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, रेल्वे मंत्र्यांना रत्नागिरी-दादर किंवा सीएसटीएम अशा गाड्या सुरू करण्याच्या मागणीचे पत्र दिले होते. मात्र, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव अशी सेवा सुरू करणे शक्य नसल्याचे सांगितले आहे. तसेच भविष्यात कोकणात जाणाऱ्या गाड्या आता थेट पश्चिम रेल्वे मार्गावरून वसई-जूचंद्र मार्गे कोकणात जाणार असल्याची माहितीही खा. वायकर यांनी दिली.

मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी, दादर, व्हीटी या रेल्वे स्थानकातील गाड्यांची गर्दी कमी करण्यासाठी जोगेश्वरी जंक्शनचे काम केले जात आहे. तर जून महिन्यापासून जोगेश्वरी जंक्शन सुरू केले जाईल. येत्या एक ते दोन वर्षात नायगाव ते जुचंद्र दरम्यान नव्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण केले जाईल. त्यामुळे भविष्यात कोकण रेल्वेसह 24 प्रकारच्या रेल्वे गाड्या या मार्गावरून धावतील.

खा. अरविंद सावंत यांनीही उठवला होता आवाज

ठाकरे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनीही उत्तर प्रदेेश बिहारला मध्य रेल्वे जादा रेल्वे सोडते आणि कोकणला जाणाऱ्या नियमित गाड्या बंद करते मग ही मध्य रेल्वे नेमकी आहे कुणासाठी? कोकणला सापत्न भावाची वागणूक का, असा सवाल लोकसभेत खा. अरविंद सावंत यांनी विचारला होता, आपले मराठीतून भाषण करत मराठी माणसाची व्यथा त्यांनी मांडली होती. यावेळी रेल्वेमंत्र्यांनी रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करू असे जाहीर केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT