Agri Koli Dhavla Songs Pudhari
पालघर

Agri Koli Dhavla Songs: घराघरात घुमणाऱ्या आगरी-कोळी संस्कृतीतील धवलारी गीतांचा मान आजही कायम

सांस्कृतिक परंपरेचे जतन व्हावे, धवलारीणींच्या प्रोत्साहनासाठी मुंबईत रंगला धवल गीत सोहळा

पुढारी वृत्तसेवा

खानिवडे : आधुनिकतेच्या लाटेत आजकाल लग्नसोहळे हायफाय पद्धतीने साजरे होत असले तरी आगरी-कोळी समाजातील पारंपरिक धवला गीतांचा मान आजही अबाधित आहे. मात्र पूर्वी प्रत्येक घराघरात सहज ऐकू येणारी ही धवलारी गीते आज हळूहळू दुर्मीळ होत चालली असून, ती जपणाऱ्या धवलारीणी आता हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या उरल्या आहेत. या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे जतन व्हावे आणि नव्या पिढीपर्यंत तिचा वारसा पोहोचावा या उद्देशाने मुंबईत धवल गीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

आगरी-कोळी समाजातील लग्नसोहळ्यात साखरपुड्या पासून तसेच मांडवाच्या दिवशी सकाळपासूनच धवलारी गीतांचा सुरेल गजर ऐकू येतो. वर-वधूला हळद लावताना, वडे काढताना “तळणावर”, वर-वधूच्या आंघोळीच्या वेळी तसेच त्यांना बाशिंग बांधून सजविताना महिलांकडून पारंपरिक पद्धतीने जी गीते गायली जातात, त्यांनाच धवला गीते असे म्हटले जाते. या गीतांमधून आनंद, आशीर्वाद, विनोद आणि संस्कृतीची सुंदर छटा अनुभवायला मिळते.

परंतु बदलत्या जीवनशैलीमुळे आणि डीजे-संगीताच्या वाढत्या प्रचलनामुळे ही परंपरा मागे पडण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे या गीतांना नवसंजीवनी मिळावी आणि धवलारीणींना प्रोत्साहन मिळावे या हेतूने समाजसेवक व नवी मुंबईचे माजी नगरसेवक चंद्रकांत शेठ पाटील यांनी धवल गीत स्पर्धेचे आयोजन केले. या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि वातावरण पारंपरिक सुरांनी दुमदुमून गेले.

या स्पर्धेत भिवंडीच्या शानुबाई जोशी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. गेली 25 ते 30 वर्षे त्या कोणत्याही मोठ्या मानधनाची अपेक्षा न ठेवता विविध लग्नसोहळ्यांमध्ये धवलारी गीते गात समाजाची ही सांस्कृतिक परंपरा जपण्याचे कार्य करत आहेत. त्यांच्या समर्पणाचा उपस्थितांनी विशेष गौरव केला. या सोहळ्यामुळे आगरी-कोळी समाजातील धवलारी गीतांची परंपरा जपण्याची आणि नव्या पिढीपर्यंत ती पोहोचवण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली. परंपरेचे हे सूर पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावेत, हीच या उपक्रमामागची खरी भावना असल्याचे आयोजकांनी सांगितले. नवी मुंबईत जागतिक महिला दिना निमित्त स्व. डी. आर. पाटील व भोलानाथ साहेब यांच्या स्मरणार्थ आगरी कोळी संस्कृतीचा सन्मान राखणारी अर्थात लग्न सोहळ्यातील पारंपारिक धवला गीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. धवला गीत स्पर्धेचे हे दुसरे वर्ष होते.

ह्या स्पर्धेचे परीक्षक म्हणून चंद्रकला ताई दासरी, नवनाथ ठाकुर, दया नाईक, संगीता पाटील यांनी काम पाहिले. सदर कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते . यावेळी सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या आगरी साहित्य शाला समूहाचे मुख्य ऍडमिन, तथा साहित्यिक जयंत पाटील आणि कवी नितुराज पाटील हे देखील उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT