उत्तर महाराष्ट्र

हतनूर धरण : १४ दरवाजे उघडले, धरणातील विसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला

backup backup

हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरु असून धरणाचे १४ दरवाजे नुकतेच उघडण्यात आले आहेत. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला आहे. जळगाव पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंत्यांनी सायंकाळपर्यंत पाणी सोडणार असल्याचे सांगितले होते. तर वाघुर धरणाचे पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाची पाणीपातळी सातत्याने वाढत आहे. रात्रीपर्यंत वाघूर धरणातून पाण्याचा विसर्ग होऊ शकतो त्यामुळे तापी नदी व वाघूर नदी काठावरील गावातील नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

हतनूर धरण पाणलोट क्षेत्रावरील भागात पाऊस सुरु असून पूर्णा नदीलाही पूर येत आहे. त्यामुळे पाणी पातळी सतत वाढल्याने धरणातील आवक ही वाढत आहे. धरणाचे ४ दरवाजे पूर्ण तर २ दरवाजे २ मीटरने उघडण्यात आले होते. त्यातून यातून २७ हजार ८२८ क्युसेक तर कालव्यातून १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरु होता. आता धरणाचे १४ दरवाजे उघडले आहेत.

तरी तापी नदीकाठावरील गावातील सर्व नागरिकांनी सावध रहावे. नदी काठावरील गावातील लोकांनी तापी नदी पात्रांमध्ये जावू नये, आपली गुरे  नदीच्या पाण्यात जाणार नाहीत. तसेच नदीपात्रालगतची आपली शेती उपयोगी साहित्य, सामुग्री, पशुधन सुरक्षितस्थळी राहील याची दक्षता घ्यावी. जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी सर्वांनी सतर्क राहून आपली काळजी घ्यावी. कुठलीही आपत्तीजन्य परिस्थिती लक्षात आल्यास त्वरीत प्रशासनास सूचित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले आहे.

वाघूर नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क रहावे

वाघूर धरणाची पाणी पातळी आज दुपारी तीन वाजता 232.350 मीटर आहे. वाघुर धरणाचे पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाची पाणीपातळी सातत्याने वाढत आहे. रात्रीपर्यंत वाघूर धरणातून पाण्याचा विसर्ग होऊ शकतो, त्यामुळे वाघुर धरणाखालील नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क राहून सावधानता बाळगावी, असा इशारा कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी दिला आहे. नदीपात्रामध्ये गुरेढोरे सोडू नये अथवा प्रवेश करू नये, असेही कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी कळविले आहे.

हेही वाचलं का? 

SCROLL FOR NEXT