नाशिक : मंगेश गायकवाड
'लाइक, शेअर आणि सबस्क्राईब' या सोशल मीडियावरील संस्कृतीने आता बालवयातील मुलांनाही भुरळ घातल्याचे चित्र दिसत आहे. मोबाईल हातात येताच अनेक मुले इंस्टाग्राम, यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तासनतास वेळ घालवत आहेत. प्रसिद्धी मिळवण्यासाठी रील्स तयार करण्याकडे त्यांचा कल वाढत आहे.
शहरातील शाळांमधील शिक्षकांच्या मते, काही विद्यार्थ्यांचे अभ्यासातील लक्ष कमी होत आहे. वर्गात सोशल मीडियावरील चर्चा अधिक रंगताना दिसतात. गृहपाठ, वाचन आणि मैदानी खेळांपेक्षा मोबाईलला अधिक वेळ दिला जात असल्याची चिंता व्यक्त होत आहे.
अनेक मुलांना कमी वेळात प्रसिद्धी मिळवण्याचे आकर्षण असल्याने ते कंटेंट क्रिएटर होण्याची स्वप्ने पाहत आहेत. मात्र, अधिक व्ह्यूज आणि फॉलोअर्स मिळवण्याच्या नादात काही मुले धोकादायक ठिकाणी रील्स बनवत असल्याच्या घटनाही समोर येत आहेत.
'लाइक' आणि 'फॉलोअर्स'च्या संख्येवर स्वतःचे यश मोजण्याची सवय काही मुलांच्या आत्मविश्वासावर परिणाम करू शकते. अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास निराशा, चिंता आणि स्वतःची इतरांशी तुलना करण्याची प्रवृत्ती वाढण्याची शक्यता असते.
तज्ज्ञांच्या मते, सोशल मीडिया पूर्णपणे बंद करण्याऐवजी त्याचा जबाबदारीने आणि मर्यादित वापर करण्याची सवय लावणे हीच काळाची गरज आहे. यासाठी पालक, शिक्षक आणि समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
"सोशल मीडिया हे मनोरंजन आणि शिक्षणाचे प्रभावी माध्यम आहे. मात्र, त्याचा अतिरेक मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतो. त्यामुळे स्क्रीन टाइमवर नियंत्रण आणि प्रत्यक्ष खेळ, वाचन तसेच कुटुंबासोबतचा वेळ वाढवणे आवश्यक आहे."— आरती मंत्री, मानसोपचार तज्ज्ञ, नाशिक
"सोशल मीडिया पूर्णपणे चुकीचा नाही. पण त्याचा अतिरेक मुलांसाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे पालकांनी मुलांशी संवाद ठेवून मोबाईल वापरावर मर्यादा घालणे गरजेचे आहे."— अर्जुन गायकवाड, चांदवड, पालक
"मुलांना मूल्य आणि जीवन शिक्षण देणे महत्त्वाचे आहे. लहान मुलांच्या मनावर परिणाम करू शकणाऱ्या संकेतस्थळांवर पालकांनीच नियंत्रण ठेवावे. मुलांशी नियमित संवाद साधून त्यांना सोशल मीडियाचा योग्य वापर शिकवणे आवश्यक आहे."— प्रा. गोकुळ सानप, नाशिक