The challenge of rebellion before the NCP in Nashik taluka
देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उमेदवार निश्चित करण्याचा अधिकार वरिष्ठ पातळीवर आहे. तालुक्यातील गावांचा सर्वांगीण विकास साधणाऱ्या आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल, असे प्रतिपादन देवळालीच्या आमदार सरोज आहिरे यांनी पक्ष बैठकीत केले.
तालुक्यात सर्वाधिक ताकद राष्ट्रवादी अजित पवार गटाची असल्याने या पक्षाकडे मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी झाली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत तिकीट कोणाला मिळते हे आज सांगणे कठीण झाले असले तरी इच्छुकांचे उदंड पीक लक्षात घेता या पक्षाला बंडखोरी रोखण्याचे आवाहन मोठ्या प्रमाणावर राहणार आहे.
नाशिक तालुक्यात मोडणाऱ्या जिल्हा परिषदेच्या गिरणारे, पळसे, एकलहरे, विल्होळी हे चार गट व गिरणारे, देवरगाव, पळसे, पिंपरी सय्यद, एकलहरे, लहवित, विल्होळी, गोवर्धन या आठ जागांसाठी इच्छुकांबरोबर संवाद साधण्याचा मेळावा आमदार सरोज आहिरे यांच्या संपर्क कार्यालयात झाला.
यावेळी इच्छुकांसह समर्थकही मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याने जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. आ. सरोज आहिरे यांच्यासह पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष निवृत्ती आरिंगळे, जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब म्हस्के, राजाराम धनवटे, विधानसभा अध्यक्ष सोमनाथ बोराडे यांच्यासह गट-गणाच्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील इच्छुकांशी संवाद साधला. या संवादादरम्यान उमेदवारांकडून गावांच्या विकासासाठीच्या कल्पना, उपक्रम आणि योजनांविषयी माहिती घेण्यात आली. २०१७ १७ च्या च्या निवडणुकीत निवडणुकीत प पक्षाने चमकदार कामगिरी केलेली असल्याने व गावोगावी या पक्षाचे समर्थक मोठ्या प्रमाणावर असल्याने इच्छुकही अधिक आहेत.
त्यामुळे मोठ्या मतदारांचा भरणा असलेल्या गावांचा विचार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कार्यकर्त्यांनी आपापल्या गट व गणाच्या विकासासाठी योग्य उमेदवारांना संधी द्यावी, अशी मागणी केली, त्यावर सर्वानुमते आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखालीच निर्णय घेतला जाईल, असे आ. आहिरे यांनी स्पष्ट केले. बैठकीस विलास धुर्जड, यशवंत ढिकले, शरद गायखे, बाळासाहेब तुंगार, ऋषिकेश पिंगळे, वामन खोसकर, साहेबराव पेखळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तीन गट, पाच गणांत विजय
२०१७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने तीन गट व पाच गणांत विजय मिळवला होता. तर शिवसेनेने दोन गणांत व अपक्षांनी एक गण व एक गटात विजयश्री मिळवली होती. त्यामुळे यंदाही राष्ट्रवादीकडे इच्छुकांची मोठी गर्दी असल्याने बंडखोरी रोखण्याचे सर्वाधिक आव्हान याच पक्षापुढे राहणार आहे.