सोलापूर : अमोल साळुंके
सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रत्नागिरी हापूस आंब्याची आवक अल्प प्रमाणात आहे. मात्र, केरळ हापूस आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून, तोच आंबा रत्नागिरी हापूस म्हणून ग्राहकांना विक्री होत आहे. त्यामुळे रत्नागिरी हापूस घेताना ग्राहकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन आंबा विक्रेत्यांकडून होत आहे.
रत्नागिरी हापूस आंब्यांचे प्रतिडझनचे दर हे एक ते दीड हजार रुपयांपर्यंत आहेत. तर केरळ हापूसचा दर फक्त २०० ते ४०० रुपये डझन आहे. तेच आंबे रत्नागिरी हापूस या नावाने एक हजार रुपयांना विक्री होत असल्याचा दावा विक्रेत्यांकडून होत आहे. त्यामुळे हापूस आंब्यांची खरेदी करताना ग्राहकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
बाजार समितीमध्ये रत्नागिरी हापूसच्या १५ ते २० पेट्या, देवगड हापूसची ४०० बॉक्स, केरळ हापूस आंब्यांची ५०० ते ६०० बॉक्स आवक होत आहे. रत्नागिरी हापूस मोठ्या प्रमाणात बाजार उपलब्ध नाही. मात्र, मागणी भरपूर असल्याने केरळ हापूस आंबा रत्नागिरी हापूस म्हणून विक्री होत आहे.
रत्नागिरी हापूसची आवक
वाढणार शहर-जिल्ह्यात रत्नागिरीच्या हापूस आंब्यांला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र, सध्या हापूस कमी प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु, येत्या आठ ते दहा दिवसांत आंब्यांची आवक वाढणार असल्याची माहिती आंबे विक्रेत्यांनी दिली आहे.
कसा ओळखावा रत्नागिरी हापूस
रत्नागिरी हापूस आंब्यांच्या बॉक्सवर घेणारा आणि देणाऱ्या व्यक्तीचे नाव असते. तर केरळ हापूस आंब्यांच्या बॉक्सवर नाव नसते. त्यामुळे ग्राहकांनी रत्नागिरी हापूस आंब्यांचा बॉक्स किंवा पेटी खरेदी करताना त्यावरील नावे तपासणी करणे गरजेचे आहे.