

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये शंभर गाव व पाड्यांना पाणीटंचाईने ग्रासले आहे. प्रशासनातर्फे या गाव-पाड्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा करून ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे. काही ठिकाणी टँकर भरून पाणीपुरवठा करता यावा म्हणून १० ' विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
एकीकडे अवकाळीच्या अस्मानी संकटाने परिसर जलमय होत शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी होत आहे, तर दुसरीकडे काही तालुक्यांमध्ये ग्रामस्थांना पिण्यासाठीही पाणी नाही, असे विरोधाभासी चित्र आहे.
नाशिक जिल्ह्यातील देवळा, इगतपुरी, मालेगाव, पेठ, सिन्नर, येवला या तालुक्यांमध्ये काही गावांना पिण्याचा तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. टंचाई निवारणासाठी ग्रामपंचायत स्तरावरून जिल्हा प्रशासनाला टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणीचे प्रस्ताव पाठविले होते.
जिल्हा प्रशासनाने ते तत्काळ मंजूर करीत ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यासाठी ३१ टँकर मंजुरीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुरवठा सुरू आहे, तर काही ठिकाणी टँकर मंजूर केले, मात्र त्यात भरण्यासाठी पाणी आणायचे कोठून ? असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामुळे तशी परिस्थिती असलेल्या तीन गावांना १० विहिरी अधिग्रहित करून पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे