नाशिक : पुढारी वृत्तसेवा
विकासाच्या नावाखाली शहरात वृक्षांची बेसुमार कत्तल केली जात असतानाच, सातपूर औद्योगिक वसाहतीतदेखील ४०० पेक्षा अधिक वृक्षांची अवैधपणे कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेला आठवडा उलटूनदेखील अद्यापपर्यंत कोणावरच कारवाई केली गेली नसल्याने, आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, संबंधितांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. औद्योगिक विकास महामंडळ कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका भूखंडावरील चारशेपेक्षा अधिक झाडांची बेसुमार कत्तल करण्यात आली आहे. रात्रीतून हा संपूर्ण प्रकार करण्यात आला असून, अद्यापपर्यंत एमआयडीसी अधिकारी अनभिज्ञ आहेत. यावरून मनसेनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल होत असताना एमआयडीसी अधिकारी गाफील कसे?, ही झाडे कोणी तोडली, कधी तोडली याबाबत यंत्रणेला माहिती कसे नाही? आदी प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
जेव्हा ही बाब एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली, तेव्हा याबाबतची तक्रार पोलिस ठाण्यात देण्याऐवजी एमआयडीसी अधिकाऱ्याने वन विभागाला पत्र देऊन नेमके काय साधले, असा सवालही मनसेच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.
हा प्रकार गंभीर असून, या प्रकरणी तत्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, नगरसेविका मयूरी पवार, जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, सचिन सिन्हा, नितीन माळी, कौशल पाटील, विधानसभा निरीक्षक संदीप दोंदे, विजय पडळ, नितीन पंडित, शहर उपाध्यक्ष विशाल भावले, मिलिंद कांबळे, ज्ञानेश्वर बगडे, कैलास मोरे आदींच्या वतीने करण्यात आली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी
या संपूर्ण प्रकरणाची उद्योग वर्तुळात चर्चा पसरल्यानंतर एमआयडीसीच्या मुंबई मुख्यालयातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाशिक गाठून, या प्रकरणाची चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे. हे दोन्ही अधिकारी तब्बल दोन दिवस नाशिकमध्ये तळ ठोकून होते. त्यांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून त्याबाबतचा अहवाल उद्योग विभागाला सुपूर्द केल्याची माहिती समोर येत आहे.