नाशिक : पुढारी वृत्तसेवा
'निवृत्तिनाथ-ज्ञानेश्वर' आणि 'ज्ञानोबा-तुकाराम' यांच्या जयघोषात, टाळ-मृदंगाच्या निनादात संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज देवस्थानची आषाढी वारी पालखी सोमवारी (दि. २९) पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहे. या ऐतिहासिक आणि भक्तिमय सोहळ्यासाठी त्र्यंबकनगरीत लाखो वारकरी व भाविक दाखल झाले असून, संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शहरातील मुख्य रस्त्यांचे सुरू असलेले खोदकाम आणि पावसामुळे झालेला चिखल यामुळे यंदा वारकऱ्यांना मोठ्या कसरतीचा सामना करावा लागत असून, पालखीच्या पारंपरिक मार्गातही प्रशासनाला बदल करावा लागला आहे.
पालखी सोहळ्यासाठी निवृत्तिनाथ ट्रस्टचा मुख्य रथ अतिशय आकर्षक पद्धतीने सजविण्यात आला असून, समाधी मंदिरावरही नयनरम्य विद्युत रोषणाई आणि सजावट करण्यात आली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो दिंड्या त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाल्या असून, सोमवारी सकाळी परंपरेनुसार शासकीय महापूजा व इतर धार्मिक विधी पार पडल्यानंतर पालखी पंढरीच्या वाटेने रवाना होत आहे.
कुशावर्त तीर्थाच्या मार्गात बदल पारंपरिक प्रथेनुसार, संत निवृत्तिनाथ मंदिराकडून निघालेली पालखी पवित्र कुशावर्त तीर्थावर जाते, तिथे त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन पालखी नाशिकच्या दिशेने पुढे निघते. मात्र, कुशावर्तकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्यांची कामे वेगाने सुरू असल्याने यंदा प्रशासनाला पालखीच्या पारंपरिक मार्गात ऐनवेळी बदल करावा लागला.
मंदिरासमोरील रस्ते खोदलेलेच
पालखी प्रस्थानाचा मुख्य दिवस उजाडला असतानाही त्र्यंबकेश्वर शहरातील रस्ते अजूनही पूर्ववत न झाल्याने वारकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील पोस्ट ऑफिस रस्ता आणि पोलिस स्टेशन मार्गावर सुरू असलेल्या कामांमुळे आणि पावसाच्या आगमनामुळे मोठ्या प्रमाणावर चिखल साचला आहे. यामुळे पायी चालणेही कठीण झाले आहे. अत्यंत चिंतेची बाब म्हणजे, ज्या संत निवृत्तिनाथ समाधी मंदिरावरून पालखी मार्गस्थ होते, त्या मंदिरासमोरील मुख्य रस्त्याचे कामही अद्याप अपूर्ण असल्याने भाविकांचे प्रचंड हाल होत आहेत.
पालखी सोहळ्याला कुठलीही अडचण येणार नाही, यादृष्टीने आम्ही सर्व विभागांशी समन्वय साधून चोख नियोजन केले आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून शहराबाहेरील वाहतूक मार्गामध्येही आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. पोलिसांच्या सहकार्याने पालखी अतिशय व्यवस्थितरीत्या मार्गस्थ केली जाईल.- गोविंद जाधव, मुख्याधिकारी, त्र्यंबक