नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने सकारात्मक भूमिका घेत समाजहिताचे अनेक निर्णय केले आहेत. त्यामुळे या विषयावर राजकारण करण्याचा प्रयत्न होत असेल, तर तो संबंधितंचा नाईलाज आहे, असा टोला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांना लगावला आहे. तसेच फडणवीस कोणत्याही एका व्यक्तीमुळे नव्हे, तर अठरापगड जातीच्या पाठिंब्यामुळेच मुख्यमंत्री झाल्याचे सांगत जरांगे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजातील व्यक्तींची ओबीसी जात प्रमाणपत्रे रद्द केली जात असल्याचा आरोप करत मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. ६) नाशिक येथे पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. दरेकर म्हणाले आक्रमक भूमिका घेणे जरांगे यांचा अधिकार आहे. मात्र, प्रत्येक विषय समजून घेणेही महत्त्वाचे आहे. जात प्रमाणपत्र पडताळणीत प्रमाणपत्र अवैध आढळल्यास कोणाच्या मागणीवरून ते वैध ठरवता येत नाही.
संबंधितांना आपले प्रमाणपत्र योग्य असल्याचा विश्वास असल्यास त्यांनी कायदेशीर आणि शासकीय यंत्रणेकडे दाद मागावी. त्याबाबतचा निर्णय सक्षम अधिकारी घेतात, असे दरेकर म्हणाले. जरांगे यांनी समाजात तेढ निर्माण करण्याऐवजी समाजाला जोडण्याचे काम करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
वाईट करायला फार अक्कल लागत नाही; पण चांगले काम करण्यासाठी दूरदृष्टी आणि संयम आवश्यक असतो, असा टोलाही त्यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांना सक्षम करण्यात त्यांचा पक्ष आणि महाराष्ट्रातील जनतेचे योगदान आहे. योगदान देता येत नसेल तर देऊ नका; पण अहंकाराची भाषा करू नका, असा पलटवारही दरेकर यांनी केला.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच संवादाचा मार्ग स्वीकारला आहे. आंदोलनाच्या काळात जरांगे यांच्याशी चर्चा करून अनेक निर्णय घेण्यात आले. तसेच राधाकृष्ण विखे-पाटील आणि प्रसाद लाड यांनीही त्यांच्याशी संवाद साधला होता.
आजही सरकार चर्चेसाठी पूर्णपणे तयार असून जरांगे यांनीही विषय समजून घेऊन सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन दरेकर यांनी केले. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावरील टीकेबाबत विचारले असता, 'तो विषय मनोज जरांगे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील आहे. त्यावर मी भाष्य करणार नाही,' असे त्यांनी स्पष्ट केले.