नाशिक : घरपट्टीची ७८३ कोटींवर पोहोचलेली थकबाकी आणि आगामी निवडणुकांसाठी करवसुली विभागातील बहुतांश कमर्चाऱ्यांची होणारी नियुक्ती या पार्श्वभूमीवर करवसुलीची निर्धारित इष्टांकपूर्ती करून थकबाकीचे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिकेने थकबाकीदार मिळकतधारकांसाठी अभय योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १ सप्टेंबरपासून ही योजना लागू केली जाणार असून याअंतर्गत घरपट्टीवरील शास्ती अर्थात दंडाच्या रकमेत तब्बल ९५ टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे.
शहरात सुमारे पावणेसहा लाख मिळकतींची महापालिका सदरी नोंद आहे. कर आकारणी विभागांतर्गत सहाही विभागीय कार्यालयांमार्फत या मिळकती तसेच जमिनींवर घरपट्टी आकारणी केली जाते. निर्धारीत कालावधीत घरपट्टी न भरल्यास दरमहा दोन टक्के शास्ती केली जाते. थकीत घरपट्टी वसूल करण्यासाठी कायद्यानुसार वॉरंट व नोटीस बजावून मिळकत जप्ती व लिलावाची कारवाई केली जाते. यासाठी वॉरंट फी, नोटीस फी तसेच सरकारी शुल्क आकारले जाते. काही वर्षांपासून घरपट्टी थकबाकीत सातत्याने वाढ होत असून, शास्तीच्या वाढीमुळे थकबाकीचा बोजा वाढत आहे. यामुळे वार्षिक इष्टांकपूर्ती करणे कठीण झाले आहे. पंधरावा वित्त आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार किमान १०० टक्के वसुली इष्टांकपूर्ती होणे आवश्यक आहे.
महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचना सुरू झाली असून निवडणूक डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. निवडणूक कामासाठी कर वसुली विभागातील बहुतांश कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार असल्याने कर वसुलीवर परिणाम होईल. त्यामुळे थकबाकीदारांसाठी अभय योजना लागू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून या प्रस्तावाला आयुक्त मनिषा खत्री यांच्या अध्यक्षतेखालील महासभेत मंजुरी देण्यात आली आहे.
१ सप्टेंबर ते ३१ आॉक्टोबर २०२५ - शास्तीच्या रक्कमेत ९५ टक्क्यांपर्यंत सवलत
१ ते ३० नोव्हेंबर २०२५ - शास्तीच्या रकमेत ८५ टक्क्यांपर्यंत सवलत
सहाही विभागातील थकबाकीदार मिळकतधारकांकडे महापालिकेची ७८३.३४ कोटींची घरपट्टी थकीत आहे. त्यामध्ये तब्बल ३२७.६४ कोटींची शास्तीची रक्कम आहे. मूळ थकबाकी ४५५.७० कोटी इतकी आहे. थकबाकीदारांनी १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबरदरम्यान एकरकमी घरपट्टी भरल्यास शास्तीच्या रकमेत ९५ टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे.
वर्षानुवर्षे बंद मिळकती, मालक-भाडेकरू व कौटुंबिक वाद, न्यायालयीन प्रकरणे व रस्ता रुंदीकरणामुळे पुर्णत: अथवा अंशत: बाधित मिळकती यांमुळे अनेक मिळकतधारक घरपट्टी भरत नाहीत. त्यात दरमहा दोन टक्के शास्तीमुळे थकबाकीचा आकडा वाढच चालला आहे.
नाशिक : घरपट्टीच्या ७२ बड्या थकबाकीदारांच्या मालमत्तांचे लिलाव प्रतिसादाअभावी तहकूब करावे लागल्यानंतर आता येत्या २१ व २२ ऑगस्ट रोजी महापालिकेच्या सहाही विभागीय कार्यालयांमध्ये या मिळकतींच्या फेरलिलावाची प्रक्रिया राबविली जाणार आहे. प्रत्येकी १०० याप्रमाणे सहाही विभागांतील आणखी १०० बड्या थकबाकीदारांच्या मिळकती जप्त करून लिलावात काढल्या जाणार आहेत.
घरपट्टीच्या थकबाकीचा आकडा ७८३ कोटींवर पोहोचला आहे. करदात्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी महापालिकेने सवलत योजना राबविली. मात्र अपेक्षित प्रतिसाद लाभू न शकल्याने अखेर बड्या थकबाकीदारांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात ७२ बड्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करून लिलावाची प्रक्रिया गेल्या महिन्यात राबविण्यात आली. मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नाही. ७२ पैकी २० मिळकतधारकांनी कर थकबाकीपोटी सुमारे ५२ लाख रूपयांचा भरणा केला. उर्वरित ५१ थकबाकीदारांना दुबार जाहीर लिलावाची नोटीस बजावण्यात येणार असून, दि. २१ व २२ ऑगस्ट रोजी फेरलिलाव प्रक्रिया राबविली जाणार आहे. तसेच नव्याने प्रत्येक विभागनिहाय १०० थकबाकीदारांना जप्तीचे अधिपत्र बजावण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार सहा विभागातील अन्य ६०० बड्या थकबाकीदारांपैकी पैकी ९६ थकबाकीदारांना नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती उपायुक्त (कर) अजित निकत यांनी दिली आहे.