नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात होणार्या रिंगरोडमुळे औद्योगिक वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. नाशिकच्या औद्योगिक व व्यापार व्यवस्थेच्या प्रगतीसाठी निफाड येथील ड्रायपोर्ट प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
निफाड प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. डिफेन्स इनोव्हेशन हबसाठी 50 एकर जागेची मागणी असून जागा उपलब्धेसाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. राजूरबहुला येथे राखीव 25 एकर जागेत आयटी पार्क विकसित करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात. नाशिकमधील अंबड व सातूपर येथील सीटीपीई केंद्र तत्काळ कार्यान्वित करावे. जिल्ह्यातील वाढत्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने नाशिकसाठी स्वतंत्र 400 केव्ही वीजपुरवठा उपकेंद्र उभारण्याची आवश्यकता असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात नाशिकमधील निमा व आयमाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीचीसे अधिकारी व उद्योजक उपस्थित होते.
मंत्री भुजबळ म्हणाले की, नाशिक जिल्ह्यात नवीन मोठ्या उद्योगांसह मोठे प्रकल्प येण्यासाठी पोषक वातावरण असून औद्योगिक विकासासाठी सदैव सकारात्मक व कटिबद्ध आहे, नाशिकमध्ये मेगा प्रकल्प व मोठे उद्योग येण्याच्या दृष्टीने या प्रकल्पांसाठी आवश्यक सेवासुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. नाशिकमध्ये कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन केंद्र तपोवनातील साधुग्रामच्या जागेत विकसित करण्यासाठी आवश्यक परवानगी व अनुषंगिक बाबींसाठी महानगरपालिकेने आवश्यक ती कार्यवाही करावी. अंबड या ठिकाणी चाचणी प्रयोगशाळा व अग्शीशमन केंद्र कार्यान्वित करण्यात यावेत. औद्योगिक वसाहतींमध्ये पुढील 50 वर्षांचा विचार करून मलनिस्सारण वाहिन्या विकसित करण्यात यावी.
बैठकीत कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र, ड्राय पोर्ट प्रकल्प, नाशिक डिफेन्स इनोव्हेशन हव, इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब, आयटी उद्योग, सामायिक पाणी प्रक्रिया केंद्र, औद्योगिक वसाहतीसाठी निधीची तरतूद करावी, वीज पुरवठा सबस्टेशन उभारण्याची मागणी, सांडपाणी व्यवस्थापन व भुयारी गटार योजना, नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प , पाडळी रल्वे स्टेशन येथे इटहरीने विकास करण्यासाठी पाठपुरावा करावा, इलेक्ट्रीकल इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर केंद्र, नवीन रिंग रोडची उभारणी, निओ मेट्रो या मुद्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली असून यातील अनेक प्रकलपांना मंजूरी मिळाली असली तरी प्रत्यक्षात सुरुवात नाही. याबाबत भुजबळांनी लक्ष देण्याची मागणी उद्योजकांनी केली.