सिन्नर : लग्नसमारंभम्हटला की, डोळ्यांसमोर येतात ते पाहुण्यांच्या स्वागतासाठी बांधले जाणारे फेटे, पाहुण्यांच्या नावाचा बडेजाव आणि स्टेजवर होणारी गर्दी. मात्र, या रूढ झालेल्या समीकरणाला छेद देत सोनोशी (ता. संगमनेर) येथील गिते आणि खंबाळे (ता. सिन्नर) येथील आंधळे परिवाराने आपल्या पाल्यांच्या विवाहात पुस्तकवाटप करून समाजात नवा पायंडा पाडला. फेट्याचा मानपान बाजूला सारून पाहुण्यांना ज्ञानाची भेट देणाऱ्या या उपक्रमाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
सोनोशी येथील प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब गिते यांचे चिरंजीव बाळासाहेब आणि अनिल आंधळे यांची कन्या शुभांगी यांचा विवाह सोहळा नुकताच नांदूरशिंगोटे येथे पार पडला. या मंगलप्रसंगी उपस्थित ७०० हून अधिक पाहुण्यांना फेटे बांधण्याऐवजी वैचारिक व प्रेरणादायी पुस्तके देण्यात आली. गिते परिवाराने सामाजिक भान जपण्याची ही पहिलीच वेळ नाही. तीन वर्षांपूर्वी कौटुंबिक लग्नात त्यांनी १,१११ केशर आंब्यांच्या रोपांचे वाटप करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला होता. या आनंदाच्या निमित्ताने विद्यार्थी सहायक समिती, पुणे या संस्थेला भोजन निधीही देण्यात आला.
'फेट्याचा मान' नव्हे, ज्ञानाचा सन्मान वन्हाडी जेव्हा वाचक होतात, तेव्हाच समाज खऱ्या अर्थान समृद्ध होतो, हेच या विवाह सोहळ्याने सिद्ध केले. डोक्यावरचा फेटा काही वेळातच बाजूला ठेवला जातो, मात्र हातात पडलेले पुस्तक आयुष्यभरासाठी विचारांची शिदोरी ठरते, अशा भावना उपस्थित पाहुण्यांनी व्यक्त केल्या.
या पुस्तकांचा समावेश वऱ्हाडी मंडळींना दिलेल्या साहित्यात प्रामुख्याने महात्मा गांधींचे 'सत्याचे प्रयोग', उत्तम कांबळे यांचे 'आई समजून घेताना', कॉ. गोविंद पानसरे यांचे 'शिवाजी कोण होता?', अच्युत गोडबोले यांचे 'किमयागार आणि अरविंद जगताप यांच्या 'पत्रास कारण की' यांसारख्या प्रसिद्ध पुस्तकांचा समावेश होता.