नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषद प्रशासनाने कुंभमेळा प्राधिकरणाला दिलेल्या जुन्या इमारतीचे भाडे आकारणी निश्चित झाली आहे. भाडेकरार करण्यास प्रशासनाने प्राधिकरणास पत्र दिल्याचे वृत्त आहे. हा भाडेकरार अद्याप झालेला नसताना, प्राधिकरणाकडून जुन्या इमारतीतील विभागांना नवीन प्रशासकीय इमारतीत जाण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला जात आहे.
त्यातून घाईघाईत पशुसंवर्धन विभागाला तत्काळ नवीन इमारतीत स्थलांतर व्हावे लागले. याशिवाय जुन्या इमारतीतील विभागाच्या सर्व चाव्यादेखील प्राधिकरणाने हाती घेतल्याचे बोलले जात आहेत. त्र्यंबकेश्वर रोडवरील एबीबी सर्कलजवळ जिल्हा परिषदेची सहामजली नवीन प्रशासकीय इमारत उभी राहिली.
येथूनच जिल्हा परिषदेचा कारभार सुरू झाला आहे. त्यामुळे जुनी इमारत कुंभमेळा प्राधिकरणास भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. महिन्याकाठी साधारणतः २० ते २५ लाख रुपयांची भाडे आकारणी निश्चित झाली असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी प्राधिकरणाने सकारात्मकता दाखविली आहे.
त्यावर जि. प. प्रशासनाने करार करण्यासाठी प्राधिकरणास पत्रदेखील दिले आहे. त्यामुळे लवकरच दोन्हींमध्ये भाडेकरार होईल. हा भाडेकरार अद्याप कागदावर आलेला नसतानाच प्राधिकरणाकडून दबंगशाही सुरू झाली आहे.
जुन्या इमारतीत बांधकामचे तिन्ही विभाग, कृषी व पशुसंवर्धन, माध्यमिक व लघुपाटबंधारे विभाग अद्यापही कार्यान्वित आहे. परंतु, प्राधिकरणाकडून या विभागांना स्थलांतरासाठी आग्रह सुरू झाला असून, दबाब टाकला जात आहे. त्यासाठी प्राधिकरणाकडून जुन्या इमारतीत अडवणुकीचे धोरण अवलंबिले जात असल्याची चर्चा कर्मचारीवर्गात आहे.
प्राधिकरणाने येथील शौचालयाला कुलूप ठोकले असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय इतरही विभागांना टाळे ठोकून विभाग ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. या वाढत्या दबावापोटी पशुसंवर्धन विभागाने दोन दिवसांपूर्वी नवीन प्रशासकीय इमारतीत स्थलांतर करून घेतले. वास्तविक, नवीन प्रशासकीय इमारतीत चार, पाच व सहा मजल्यांवरील बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. बांधकाम सुरूच आहे.
मात्र, प्राधिकरणामुळे पशुसंवर्धन विभागाला समाजकल्याण सभापती दालनात स्थलांतर व्हावे लागले आहे. जुन्या इमारतीतील इतर विभागांवरही प्राधिकरणाने दबाब टाकण्यास सुरुवात केली आहे. मात्र, नवीन प्रशासकीय इमारतीतील विभागाचे काम पूर्ण नसताना स्थलांतर कसे करावयाचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जि.प. प्रशासनाने यात लक्ष घालण्याची मागणी कर्मचारी वर्गाकडून होत आहे.