नाशिक : अल-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे यंदा पर्जन्यमान कमी होण्याची शक्यता लक्षात घेऊन नाशिक महापालिकेने शहरात टप्प्याटप्प्याने पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आज (दि. २०) पासून सुरू होत असून, शहरातील नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
नाशिक शहरासाठी गंगापूर, दारणा आणि मुकणे धरण समूहातून दररोज सुमारे ६०० दशलक्ष लिटर पाणी उचलले जाते. १५ ऑक्टोबर २०२५ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीसाठी ६४०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले होते. त्यापैकी १४ जूनपर्यंत ५१३३.९९ दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला असून, सध्या केवळ १२६६.०१ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण शिल्लक आहे. दररोजचा सरासरी वापर २१.१३ दशलक्ष घनफूट असल्याने उपलब्ध साठा केवळ ६० दिवस पुरेल, असे महापालिकेच्या गणनेतून स्पष्ट झाले आहे. मात्र १५ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत ७८ दिवसांचा कालावधी असल्याने सुमारे १८ दिवसांच्या पाण्याची तूट निर्माण होण्याची शक्यता आहे.
ही तूट भरून काढण्यासाठी जूनमध्ये दोन शनिवार, जुलैमध्ये चार शनिवार आणि ऑगस्ट महिन्यात दोन दिवसाआड पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जून व जुलै महिन्यातील प्रत्येक शनिवारी शहरात पाणीपुरवठा होणार नाही.
तसेच ऑगस्टमध्ये १, ४,७, १०, १३, १६, १९, २२, २५, २८ आणि ३१ तारखेला पाणीपुरवठा बंद राहणार आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत अनावश्यक पाण्याचा वापर टाळण्याचे आवाहन केले असून, पाणीटंचाईची परिस्थिती टाळण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
एकूण आरक्षित पाणी : ६४०० दशलक्ष घनफूट
१४ जूनपर्यंत वापर : ५१३३.९९ दशलक्ष घनफूट
शिल्लक साठा : १२६६.०१ दशलक्ष घनफूट
रोजचा वापर : २१.१३ दशलक्ष घनफूट
उपलब्धता : फक्त ६० दिवस
आवश्यक कालावधी : ७८ दिवस
संभाव्य तूट : १८ दिवसांची