नाशिक : राज्यासह नाशिक जिल्ह्यातील हवामानात वेगाने बदल होत असून, उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचे ढग दाटले आहेत. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असले तरी विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि वादळी वारा यांचा जोर अधिक राहण्याची शक्यता हवामान अभ्यासक दीपक जाधव यांनी वर्तविली आहे.
दुसरीकडे नागरिक उकाड्याने हैराण झालेले असताना शहर व जिल्ह्यात सोमवारी (दि.२०) रात्री २ च्या सुमारास विजेच्या कडकडाटांसह पावसाने हजेरी लावली. जोरदार वारा व विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होता. मात्र, पावसाने तुरळक हजेरी लावल्याने शहर जिल्ह्यात पावसाचा शिडकावा झाला. ऐन रात्रीच्या सुमारास वारा विजांचा कडकडाट आणि जोराच्या वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे शेतात व खळ्यावरील माल झाकताना मोठी धावपळ उडाली. सकाळपर्यंत शहराच्या विविध भागांत झालेल्या पावसाची १.८ मिमी इतकी नोंद झाली. विशेषतः उत्तर महाराष्ट्रात रात्री २ ते पहाटे ४ या वेळेत पावसाचा पॅटर्न तयार होत असल्याचे गत दोन दिवसांपासून दिसून येत आहे.
गारपिटीचा धोका नाशिक जिल्ह्यातही डोंगराळ भागात गारपिटीची शक्यता नाकारता येत नाही. मागील काही दिवसांत पिके वाचवताना शेतकऱ्यांना इजा झाल्याच्या घटना घडल्याने, स्वतःच्या आरोग्याची आणि जीवाची काळजी घेऊनच शेतीकामाचे नियोजन करावे, असा मोलाचा सल्ला हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.
तापमानाचा पारा ३९.३ अंशांवर
एकीकडे नाशिकचा पारा ३९.३ अंशांवर पोहोचल्याने नाशिककर उकाड्याने हैराण झाले आहेत. सोमवारी (दि. २०) दिवसभर नाशिकमध्ये सूर्य आग ओकत होता. कमाल तापमान ३९.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हाची तीव्रता सर्वाधिक असते. यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे.