नाशिक

Nashik Surgana : बिबट्या दिसताच महिला हंडे टाकून पळाल्या; संतप्त महिलांचा रास्ता रोको

गणेश सोनवणे

सुरगाणा (जि. नाशिक) प्रतिनिधी; सुरगाणा तालुक्यातील जांभुळपाडा दा. येथील ग्रामस्थांना गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. महिलांना जंगलातील झिऱ्यावर पाण्यासाठी आटापिटा करत जंगलात पहाटे, दिवस रात्र पाण्याच्या शोधात जावं लागत आहे. (दि. 21) सकाळी 5.30 च्या सुमारास काही महिला नेहमीप्रमाणे पाणी भरण्यासाठी गेल्या असता त्यांना अचानकपणे बिबट्या आढळून आला, बिबट्याचे दर्शन होताच सगळ्या महिल्यानी हंडे टाकून पळ काढला. आरडा-ओरडा सुरु होताच संपूर्ण गाव गोळा झाले, संपूर्ण महिला, पुरुष एकत्र येत रस्ता अडवत रस्त्यावर सर्व हांडे ठेवून महिलांनी हंडा मोर्चा काढत रास्ता रोको केला.

मंगळवार हा मनखेड बाजार असल्याने बाजारासाठी आलेल्या सगळ्या गाड्या त्यांनी तब्बल २ ते ३ तास अडवून ठेवल्या. सरपंच, ग्रामसेवक यांच्याशी फोन द्वारे बोलने झाल्यावर त्यांनी तात्काळ सोय करून देऊ या आश्वासनावर रस्ता मोकळा करून दिला. मात्र त्यानंतर त्यांनी त्या गावाशी संपर्क सुद्धा केलेला नाही. गेल्या सहा महिन्यांपासून विजपुरवठा खंडित असल्यामुळे बोअरवेल चालत नाही, त्यासंदर्भात उपसरपंच जयवंती ज्ञानेश्वर वार्डे यांनी गेली सहा महिने वारंवार पाठापुरावा करून तसेच सरपंच, ग्रामसेवक यांना वारंवार सांगून सुद्धा त्याकडे दोघांनी डुंकूनही बघितले नाही अशी तक्रार ग्रामस्थांनी केली. गट विकास अधिकारी यांना गावाची व्यथा सांगितली यावर तात्काळ उपाय करून तात्पुरती पाण्याची सोय करण्याचे आश्वासन देऊन भेट घेऊन चर्चा करण्यासाठी ग्रामस्थ यांना बोलावून घेतले आहे. पाणी समस्या कायमची दूर व्हावी यांची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी तेथील ग्रामस्थांनी केली आहे.

जांभूळपाडा दा. ग्रामस्थ यांनी असे म्हटले की, आम्ही जन्माला आल्यापासून नळ पाणीपुरवठा योजना कार्यन्वित नाही, येथील लोकप्रतिनिधी फक्त मताचे राजकारण करण्यासाठी फक्त मतदानापुरते येता आणि नंतर कधी फिरकत सुद्धा नाही. सत्य साई परिवारामार्फत बोअरवेलची सोय केली होती परंतु तेथील विजपुरवठा गेल्या सहा ते सात महिन्यांपासून बंद आहे. गेली सहा -सात महिने गाव अंधारात आहे. त्यातल्या त्यात भीषण पाणीटंचाई, जंगली जनावरांची दहशत या सर्व गैरसोयींमुळे  गावातील नागरिक हैराण झाले आहेत. ग्रामस्थांचे हाल सुरू आहेत. त्यामुळे मंगळवार (ता. 21) संतप्त महिलांनी भल्या पहाटे हंडा मोर्चा काढून रास्ता रोको केला. मेन रस्ता अडवत महिलांनी हंडे वाजवून संताप केला. एक तास होऊनही सरपंच व ग्रामसेवक घटनास्थळी न आल्याने ग्रामस्थांनी आणखी रोष व्यक्त केला. गावात पाण्याचे टँकर सुरू करण्याची तेथील ग्रामस्थांची मागणी आहे. या हंडा मोर्चामध्ये उपसरपंच जयवंती ज्ञानेश्वर वार्डे, सावळीराम पवार, भीमराज गंगोडे, ज्ञानेश्वर वार्डे, गंगा धूम, पुंडलिक पवार, भगवान पवार, छगन पवार, नामदेव पवार, लक्ष्मण जाधव, रामदास गोतुरणे आदिंसह महिलावर्ग व ग्रामस्थ सहभागी झाले होते.

गेली सहा ते सात महिन्यांपासून भीषण पाणीटंचाईची समस्या आहे. ती दूर होऊन या समस्येपासून कायमची सुटका करावी. वारंवार तक्रारी करूनही आमच्या तक्रारीचे अद्याप निवारण झालेले नाही. महिलांना न्याय देण्यासाठी प्रयत्न व्हावेत अन्यथा येणाऱ्या हप्त्याभरात हंडा मोर्चा काढून तीव्र आंदोलन करू – जयवंती वार्डे, रोंगाणे ग्रामपंचायत उपसरपंच

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT