नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वरला सुरू असलेल्या विकासकामांना आता वेळेचे बंधन घातले जाणार आहे. कुंभमेळ्याशी संबंधित सर्व कामे एप्रिल २०२७ पर्यंत पूर्ण करण्याची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. या मुदतीनंतर जेवढे काम अपूर्ण राहील, त्याचा आर्थिक भार संबंधित विभागावर टाकण्याचे धोरण स्वीकारले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.
प्रयागराजच्या धर्तीवर नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरू आहे. गत सिंहस्थाच्या तुलनेत यंदा दहापट भाविक नाशिकमध्ये येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार विविध विभागांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकासकामे हाती घेण्यात आली आहेत.
नाशिक शहरातील २८ रस्त्यांची कामे, गोदावरी नदी स्वच्छ व अविरत वाहण्यासाठी नाशिक व त्र्यंबकेश्वरमधील मलनिस्सारण प्रकल्प, सीसीटीव्ही यंत्रणा, त्र्यंबक-पहिने-घोटी चौपदरीकरण, नाशिक-त्र्यंबक रस्ता विस्तारीकरण, द्वारका सर्कल अंडरपास, परिक्रमा मार्ग, गोदावरीवरील घाट, त्र्यंबकेश्वर पेयजल योजना, तपोवनातील साधुग्राम, तीर्थक्षेत्र विकास, ओझर विमानतळ टर्मिनल विस्तार, विविध रेल्वेस्थानकांचे नूतनीकरण, रामकाल पथ आणि त्र्यंबकेश्वर दर्शन पथ आदी कामांचा त्यात समावेश आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वरसह राज्यातील विविध तीर्थक्षेत्रांमध्ये जवळपास ३५० कामे सुरू आहेत. मात्र, निधी उपलब्ध होण्यात होणारा विलंब, निविदा प्रक्रियेतील अडथळे तसेच तांत्रिक कारणांमुळे काही कामांना विलंब होत आहे. मंत्रालय पातळीपासून विविध समित्यांकडून कामांचा सातत्याने आढावा घेतला जात आहे.
मुदतवाढीची मागणी होण्याची शक्यता लक्षात घेता एप्रिल २०२७ ची अंतिम मुदत कठोरपणे लागू करण्याची तयारी आहे. मुदतीनंतर अपूर्ण राहिलेल्या कामांचा निधी अथवा संबंधित कंत्राटदारांची देयके त्या-त्या विभागालाच उचलावी लागणार आहेत. त्यामुळे वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या विभागांवर आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे.
कामे वेळेत पूर्ण करण्याच्या नादात दर्जाशी तडजोड होऊ नये, यासाठी गुणवत्तेलाही प्राधान्य दिले जाणार आहे. देयके मंजूर करताना कामाचा दर्जा हा महत्त्वाचा निकष राहणार आहे. त्यामुळे वेळेत काम पूर्ण करणे आणि त्याचवेळी गुणवत्तेचा कस लावणे, हे सर्वच सरकारी विभागांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.