Nashik-Pune high-speed corridor gets a big boost
लासलगाव : राकेश बोरा
महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरे नाशिक आणि पुणे यांना थेट आणि जलद रेल्वे संपर्क देणाऱ्या महत्त्वाकांक्षी नाशिक - पुणे हायस्पीड कॉरिडॉर प्रकल्पाला मोठी गती मिळाली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत या प्रकल्पावरील सूचनांना उत्तर देताना नवीन मार्गरचना जाहीर केली. हा मार्ग राज्यातील उद्योग, पर्यटन, शिक्षण आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राला नवीन उंचीवर नेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पूर्वी सुचवलेल्या नारायणगाव मार्गावरून रेल्वे गेल्यास जीएमआरटी या आंतरराष्ट्रीय वेधशाळेच्या संशोधनात अडथळे निर्माण होतील, असा विज्ञान व तंत्रज्ञान विभाग तसेच अणुऊर्जा विभागाचा आक्षेप होता. त्यामुळे राज्य सरकार, तज्ज्ञ आणि स्थानिक प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेनंतर नवीन पर्यायी मार्गरचना निश्चित करण्यात आली. राज्य सरकार, स्थानिक प्रतिनिधी, रेल्वे प्रशासन आणि प्राधिकरणांचा समावेश असलेली समिती या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासावर पुढील निर्णय घेणार आहे.
नवीन प्रस्तावित मार्ग
नाशिक साईनगर शिर्डी पुणतांबा - निंबळक -अहिल्यानगर-पुणे (चाकण औद्योगिक वसाहतमार्गे) हा मार्ग आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र सुरक्षित ठेवत दोन्ही शहरांतील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी करेल.
प्रकल्पातील सध्याची प्रगती
नाशिकरोड - साईनगर शिर्डी दुहेरी मार्गाचा डीपीआर तयार, साईनगर शिर्डी- पुणतांबा (१७७किमी) दुहेरीकरणासाठी २४० कोटी रुपयांची मंजुरी, पुणतांबा - निंवळक (८० किमी) दुहेरीकरण पूर्ण, निंबळक - अहिल्यानगर (६ किमी) काम प्रगतिपथावर, अहिल्यानगर -पुणे (१३३ किमी) नवीन दुहेरी मार्गासाठी ८९७० कोटी रुपयांचा डीपीआर तयार
पर्यटनाला मोठी चालना
या मार्गामुळे धार्मिक, सांस्कृतिक आणि वारसा पर्यटनाला मोठा हातभार लागण्याची शक्यता आहे. साईनगर शिर्डी, त्र्यंबकेश्वर, पंढरपूर या धार्मिक स्थळांशी गतिमान संपर्क होऊन पुण्यातील ऐतिहासिक किल्ले, पेशव्यांच्या वारशाचे स्थळे यांच्याशी सोयीस्कर जोडणी होईल. यामुळे ग्रामीण पर्यटन आणि स्थानिक हस्तकला उद्योगांना प्रोत्साहन मिळेल. भक्त आणि पर्यटकांना अधिक जलद, सुरक्षित आणि सुरळीत प्रवास अनुभवता येणार आहे.
उद्योग - विकासासाठी गेमचेंजर
चाकण, आंबेगाव, शिरूर, सिन्नर आणि नाशिक परिसरातील औद्योगिक पट्टघांसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. थेट रेल्वे जोडणीमुळे मालवाहतुकीचा खर्च घटणार आहे. लॉजिस्टिक साखळी अधिक सक्षम होणार असून, एमएसएमई उद्योगांना नवी बाजारपेठ मिळेल. नवीन औद्योगिक गुंतवणुकीकडे आकर्षण वाढणार आहे. शैक्षणिक-तंत्रज्ञान क्षेत्रात नवी संधी मिळणार आहे. नाशिक आणि पुणे हे दोन्ही वेगाने वाढणारे शैक्षणिक केंद्र ठरणार आहेत. रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले की, पंतप्रधानांच्या मल्टीमोडल दळणवळण दृष्टिकोनातून 'गती शक्ती मल्टीमोडल कार्गो टर्मिनल्स' या उपक्रमांतर्गत देशभरातील १३० टर्मिनल्स कार्यरत आहेत. नाशिक-पुणे कॉरिडॉरही याच दृष्टिकोनाशी जोडला जाईल.