नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महागाईने सर्वोच्च शिखर गाठले असतानाच, शालेय साहित्याच्या किमतीत झालेली २० ते २५ टक्क्यांची वाढ पालकांची बजेट कोलमडणारी ठरत आहे. गणवेश, वह्या, पुस्तके, स्कूल बॅग, शालेय शूज, टिफिन अशा सर्वच वस्तूंच्या किमतींत मोठी वाढ झाल्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षे सुरू होण्याअगोदरच खर्चाचा बोजा वाढला आहे. एकीकडे नवीन दप्तरे, आकर्षक पेन्सिल बॉक्स, कार्टून थीमच्या बाटल्या आणि आधुनिक स्टेशनरीची मुलांना भुरळ पडत असताना, दुसरीकडे बजेट सांभाळताना पालकांना कसरत करावी लागत आहे.
शहरातील रविवार कारंजा, मेन रोड, भद्रकाली, अशोक स्तंभ परिसरातील पुस्तक व स्टेशनरी दुकानांमध्ये पालकांची गर्दी बघावयास मिळत आहे. यंदा हलक्या वजनाच्या अर्गोनार्मिक बॅगा, बटण दाबताच झाकण उघडणाऱ्या स्टीलच्या बाटल्या, आकर्षक टिफिन बॉक्स, मुलांचे फेव्हरेट कार्टून्सचे कव्हर असलेल्या वह्या, वैविध्यपूर्ण पेन्सिल बॉक्स बाजारात दाखल झाल्या असून, मुलांचे लक्ष वेधून घेत आहेत.
मात्र, या साहित्याच्या किमती गतवर्षीच्या तुलनेत अधिक असल्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. विक्रेत्यांच्या मते, इंधन दरवाढीमुळे सर्वच शालेय साहित्यांच्या किमती वाढल्या आहेत. कागद, प्लास्टिक, कापड आणि वाहतूक खर्च वाढल्यामुळे किमतींत सुमारे २० ते २५ टक्क्यांची घसघशीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ५०० ते ७०० रुपयांना मिळणारी शालेय बंग यंदा ७०० ते १२०० रुपयांना मिळत आहे.
वॉटरबॅगच्या किमती जवळपास दुपटीने वाढल्या आहेत. २०० ते ३५० रुपयांपर्यंत मिळणाऱ्या वॉटरबॅगची किंमत ३५० ते ६०० रुपयांवर पोहोचली आहे. पेन्सिल बॉक्स, टिफिन बॉक्स, रंगसाहित्य, शूज यांच्या किमतींतही मोठी वाढ झाली आहे. गणवेशाचा खर्चदेखील वाढला आहे.
शाळा व्यवस्थापनाकडून फीमध्ये वाढ
शहरातील सर्वच खासगी शाळांनी फीमध्येही मोठी वाढ केली आहे. शाळांकडून १० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक फीवाढ केली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पालकांची चिंता अधिकच वाढली आहे. एकीकडे शालेय साहित्यात वाढ झाली असतानाच, फीमध्ये केलेली वाढ पालकांचे कंबरडे मोडणारी ठरत आहे.
यंदा शालेय साहित्याच्या किमतींत मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच मुलाच्या शाळेची फी भरली. त्यातदेखील वाढ केली गेली. आता साहित्याच्या किमती वाढल्यामुळे अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. महिन्याच्या सुरुवातीला बजेट संपल्यामुळे महिन्याचा खर्च भागवणे अवघड झाले आहे.- राहुल निकाळजे, पालक