नाशिक : पुढारी वृत्तसेवा
बांगलादेश व यमन देशात कांद्याचे भरघोस उत्पादन त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर कांद्यांची निर्यात थांबल्याने कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. त्यातच नाफेडने जाहीर केलेल्या दरापेक्षा खुल्या बाजारातील व्यापारी जादा दर देत नसल्याने शेतकऱ्यांनी नाफेडकडे पाठ फिरविली आहे.
जिल्ह्यात नाफेडकडे केवळ ४४ टन कांदा खरेदी झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादन व कांदा बियाणे उत्पादनाचा धर्तीवर बांगला व यमन देशात स्थानिकस्तरावर त्यांना दर्जेदार कांदा उपलब्ध होत आहे. त्यातच इराण युद्धामुळे निर्यात ठप्प झाली आहे.
त्यामुळे कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याने गत सप्ताहात आमदार रोहित पवारांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी प्रसाद यांनी मंगळवारी सायंकाळी पिंपळगाव येथे नाफेड व एमपीएस केंद्राला भेट देऊन एकूण खरेदीचा आढावा घेतला, तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. जिल्ह्यात केवळ ४४ टन कांद्याची खरेदी झाल्याची आकडेवारी जिल्हाधिकाऱ्यांनी मिळाली.
नाफेडने कांद्याला १३३५ रुपये क्विंटलचा दर जाहीर केला आहे. त्यासाठी पूर्वनोंदणी, पीक नोंदणी आवश्यक आहे. नाफेडच्या नियमानुसार चांगल्या दर्जाच्या कांद्याला खुल्या बाजारात दोनशे ते चारशे रुपये प्रतिक्विंटल दर जास्त भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी नाफेडपेक्षा खुल्या बाजारात विक्रीला अधिक प्राधान्य देत आहेत.
७० टक्के शेतकऱ्यांची नोंदणी नाही अनेक शेतकऱ्यांनी आंतरपीक म्हणून कांदा पीक मोठ्या प्रमाणात घेतले आहे. त्यामुळे शेतकऱ्याने द्राक्ष किंवा इतर मुख्य पिकांचीच पीक नोंदणी केली आहे. त्यात आंतरपिकाची नोंदणी झालेली नाही, त्यामुळे ७० टक्के कांदा शेतकरी नाफेड पीक नोंदणी नसल्याने ते आपला माल नाफेडला देऊ शकत नसल्याचे चित्र जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीत स्पष्ट झाले.
कांदा खरेदी केंद्र सुरू करा
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पिंपळगाव बाजार समिती तसेच नाफेड कार्यालयात भेट देत तातडीने खरेदी केंद्र सुरू करण्यास व प्रत्येक बाजार समिती प्रवेशद्वारावर दराबाबत फलक लावण्याचे निर्देश दिले. निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी लासलगाव बाजार समितीत भेट देत पाच वर्षातील कांदा आवक आणि दराबाबत माहिती घेतली. मागील वर्षी ५ लाख मे. टनांवरून यंदा २ लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
शेतकरी व विविध संघटनांकडून नाफेडने बाजार समितीतून कांदा खरेदी करावी, अशी मागणी होत आहे. लासलगाव आणि पिंपळगाव येथील नाफेडच्या गोदामांत कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळ उभारलेल्या आहेत. कांदा खरेदीबाबत नाफेडच्या कार्यवाहीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नाफेडच्या कार्यालयात जात माहिती घेतली.
जिल्ह्यात १८ सेंटर मंजूर करण्यात आले असून, ३ गोदाम बांधले आहेत. नाफेडला थेट खरेदी करण्यात अडचणी आहेत. त्यामुळे नाफेडने प्रत्येक बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर खरेदी केंद्राची माहिती देताना दरही जाहीर करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले. या उपाययोजनांची मागणी भारतीय कांदा आयात करण्यासाठी केंद्र सरकारने बांगलादेशकडे प्रयत्न करावेत, श्रीलंकेने वाढवलेला कांदा आयात कर कमी अथवा रद्द करण्यासाठी हस्तक्षेप करावा, युद्धजन्य परिस्थितीत कांदा निर्यात सुलभकरण्यासाठी राजनैतिक प्रयत्न करावेत, कांदा निर्यातीसाठी कंटेनरची उपलब्धता वाढवून वाढलेले भाडे नियंत्रणात आणावे, कांदा वाहतुकीसाठी विशेष रेल्वे व वॅगन उपलब्ध करून द्यावेत आदी मागण्या यावेळी शेतकऱ्यांनी तसेच व्यापाऱ्यांनी केल्या.
शेतकऱ्यांनी चांगल्या दर्जाचा कांदा साठवण करून ठेवला तर त्यांना दिवाळीनंतर चांगला दर मिळू शकेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी दर्जेदार कांदा साठवून ठेवावा, त्याचा नक्कीच फायदा होऊ शकेल.- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, नाशिक