नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महापालिकेत भाजपला पूर्ण बहुमत असल्याने सत्तास्थापनेसाठी कुबड्यांची गरज नसल्याचे कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांचे वक्तव्य शिवसेने (शिंदे गटा) ला चांगलेच झोंबले आहे.
भाजप शहराध्यक्ष सुनील केदार स्वतः आमच्या कार्यालयात सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव घेऊन आले होते. त्यामुळे महाजनांचे वक्तव्य चुकीचे असून, भाजपमध्ये समन्वयाचा अभाव यावरून दिसत असल्याची टीका शिवसेनेचे उपनेते तथा महापालिकेतील गटनेते अजय बोरस्ते यांनी केली आहे.
नाशिक महापालिकेतील १२२ पैकी सर्वाधिक ७२ जागांवर भाजपने विजय मिळविला आहे. भाजपने सलग दुसऱ्यांदा महापालिकेची सत्ता एकहाती काबीज केली आहे.
यानंतरही भाजप शहराध्यक्ष केदार यांनी केंद्र व राज्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीची सत्ता असल्याचे सांगत शिवसेना, राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना नाशिक महापालिकेतील सत्तेत सहभागाचा प्रस्ताव दिला होता.
यानंतर मंत्री महाजन यांनी मात्र आम्हाला सत्तेत कोणाच्याही कुबड्यांची आवश्यकता नसल्याचे विधान केले. त्यांच्या या वक्तव्यावरून आता महायुतीत बेबनाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या शिवसेनेकडून भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे.
'भाजपकडूनच सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव आला होता. आता तेच नाही म्हणत आहेत. भाजपमध्येच समन्वयाचा अभाव आहे,' असा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
शिंदेसेनेकडून मोर्चेबांधणी
महाजन यांच्या वक्तव्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेने महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी आता मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महापौरपदासाठी रंजना बोराडे यांनी तर विलास शिंदे, सुवर्णा मटाले आणि राहुल दिवे यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज घेतले आहेत.