नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात मंगळवारी (दि.२) पहिल्यांदा मुसळधार पावसाने आणि वादळी वाऱ्याने दाणादाण उडवली. गंगाघाट परिसरातील श्री कपालेश्वर महादेव मंदिरालगत असलेल्या बिवलकर वाड्याची भिंत कोसळल्याने दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेत केरळहून दर्शनासाठी आलेल्या एका भाविकासह मंदिर परिसरात फूलविक्री करणारा विक्रेता जखमी झाला.
वादळी वाऱ्यामुळे बिवलकर वाड्यावरील पत्रे हवेत उडून मंदिर परिसरात पडले. तसेच वाड्याच्या भिंतीचा काही भाग कोसळल्याने फूलविक्रेत्याच्या अंगावर विटा पडल्या. दरम्यान, उडालेला पत्रा केरळमधून आलेल्या भाविकाच्या डोक्याला लागल्याने तो जखमी झाला.
जखमी भाविकाला तत्काळ देवस्थान कार्यालयात नेऊन प्राथमिक उपचार करण्यात आले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मंदिर परिसरात एकच गोंधळ उडाला. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी सुरक्षिततेसाठी मंदिराच्या आतील भागात धाव घेतली. संबंधित बिवलकर वाड्याची मिळकत श्री कपालेश्वर महादेव मंदिर संस्थानने विकत घेतली आहे.
या मिळकतीच्या एका भागास महापालिकेने धोकादायक इमारत म्हणून नोटीस बजावत तो भाग पाडण्याचे निर्देश दिले होते. तर उर्वरित भागात अनधिकृत बांधकाम असून, त्यावरील कारवाई अद्याप प्रलंबित असल्याचे सांगितले जाते.
या संदर्भात मंदिर संस्थानने वेळोवेळी महापालिकेशी पत्रव्यवहार करून धोकादायक रचनेबाबत लक्ष वेधले होते. मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप भाविक आणि स्थानिक नागरिकांनी केला आहे. या घटनेनंतर महापालिकेच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.