नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील एका नामांकित मल्टिनॅशनल आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक शोषण, छळ आणि धर्मांतराच्या प्रयत्नांशी संबंधित प्रकरण अधिक गंभीर होत असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेतील पीडित महिला कर्मचाऱ्यांची तक्रारीची दखल न घेणाऱ्या पुणे येथील एचआर विभागप्रमुख अश्विनी अशोक चैनानी (५१) ला पुणे येथून अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात आतापर्यंत नऊ तक्रारी दाखल झाल्या असून, आणखी काही पीडित पुढे येण्याची शक्यता आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांकडून विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे.
संबंधित कंपनीत २०२२ पासून काही कर्मचाऱ्यांकडून महिला सहकाऱ्यांवर लैंगिक छळ, विनयभंग तसेच धार्मिक भावना दुखावल्याचे आरोप करण्यात आले आहेत. पीडित महिलांचे वय १८ ते २६ वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जाते. काही तक्रारींमध्ये जबरदस्तीने धार्मिक विधी करण्यास भाग पाडणे, आक्षेपार्ह वक्तव्ये करणे, तसेच वैयक्तिक आयुष्याबद्दल लज्जास्पद प्रश्न विचारणे अशा प्रकारांचा उल्लेख आहे.
काही प्रकरणांत संबंधित कर्मचाऱ्यांनी ऑफिस परिसरातच अनुचित वर्तन केल्याचेही नमूद करण्यात आले आहे. याशिवाय एका पुरुष कर्मचाऱ्यालाही जबरदस्तीने धार्मिक आचार पाळण्यास भाग पाडल्याची तक्रार आहे. या प्रकरणामुळे सोशल मीडियावर 'कॉर्पोरेट जिहाद' असा उल्लेख करून चर्चा रंगत आहे. मात्र, तपास यंत्रणांनी याबाबत कोणतीही पुष्टी केलेली नाही.
पीडितांसाठी ११२ हेल्पलाइन क्रमांक
पोलिसांनी संभाव्य पीडितांना पुढे येण्यासाठी ११२ हा हेल्पलाइन क्रमांक जारी केला असून, तक्रारदारांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणामुळे कॉर्पोरेट क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, कंपन्यांमधील अंतर्गत तक्रार निवारण यंत्रणा कितपत प्रभावी आहेत, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
'आयटी कंपनीतील प्रकार गंभीर; सखोल तपास करणार'
नाशिकमधील आयटी कंपनीत घडलेला प्रकार गंभीर असून सखोल चौकशी करणार, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. नाशिकमध्ये बेरोजगार तरुणींना नोकरीचे आमिष दाखवून त्यांना जाळ्यात ओढणे, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणे आणि त्यानंतर त्यांचे धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकणे, अशी एक भयानक मोडस ऑपरेंडी येथे राबवली जात असल्याचे प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी, लैंगिक अत्याचाराचे ९ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ६ जणांना अटकही झाली आहे. आता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीदेखील या प्रकरणी भाष्य केले आहे. नाशिक घटनेचा सखोल तपास होईल, असे ते म्हणाले.