नाशिक : जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेच्या १० संचालकांनी दिलेल्या राजीनाम्यांचा फैसला गुरुवारी (दि. २३) होण्याची शक्यता आहे. संचालकांच्या राजीनाम्यावर विचारविनिमय करण्यासाठी संचालक मंडळाची ही बैठक अध्यक्ष नीलेश देशमुख यांनी आयोजित केली आहे. या बैठकीत चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बँकेतील सत्ताधारी अंतर्गत गटबाजीमुळे १० संचालकांनी विद्यमान अध्यक्षांच्या मनमानी कारभाराविरोधात जाऊन तब्बल १० संचालकांनी राजीनामे दिल्यानंतर सभासदांमध्ये खळबळ उडाली. या संचालकांच्या राजीनाम्यामुळे संचालक मंडळ अल्पमतात आले असून, बँकेवर प्रशासक येणार अशी चर्चेच्या या भीतीने सभासदांनी बँकेकडे धाव घेतली. सभासदांनी आमच्या ठेवीला धोका नाही ना, अशी विचारणा केली. मात्र, बँकेने ठेवी सुरक्षित असल्याचे सांगत, बँकेचे कामकाज सुरळीत सुरू असल्याचे समजावून सांगत सर्वांना धीर दिला. काही सभासदांनी राजीनामा दिलेल्या संचालकांची समजूत काढत बँक हितासाठी राजीनामे मागे घेण्याची मागणी केली.
सत्ताधारी गटातीलही काही संचालकांनी दोन्ही गटांतील वाद मिटविण्यासाठी पुढाकार घेत मार्ग काढण्यासाठी चर्चा सुरू केल्याचे बोलले जात आहे. यातील काही संचालकांनी बँकेच्या माजी संचालकांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.
बँकेची आर्थिक स्थिती उत्तम: सीईओ आढे
दहा संचालकांनी दिलेल्या राजीनांम्यानंतर सभासद, खातेदार, ठेवीदार यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद आढे यांनी बँकेची आर्थिक स्थिती स्पष्ट केली आहे. सभासदांचे हित ठेवून काम करणाऱ्या बँकेची आर्थिक स्थिती उत्तम आहे. दि. ३० जून २०२६ रोजीच बँकेने ४०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण केला असून, आजमितीस ४०४ कोटी ठेवी झालेल्या आहेत.
कर्ज वाटप २७४ कोटी, गुंतवणूक १७३ कोटी असून, यावर्षी ६ कोटी ९ लाख रुपये इतका ढोबळ नफा झाला असून, २ कोटी ७२ लाख रुपये इतका निव्वळ नफा झालेला आहे. बँकेचा एकूण व्यवसाय ६६७ कोटी ६३ लाख इतका आहे. बँकेस मागील २० वर्षांपासून सतत ऑडिट वर्ग 'अ' प्राप्त होत आहे. बँकेचा निव्वळ एन.पी.ए. १ टक्क्याच्या आत आहे. बँकेची आर्थिक स्थिती 'अतिशय उत्तम' व 'भक्कम' असून, बँकेचे नियमित कामकाज अतिशय 'व्यवस्थित' चालू आहे. बँक ही आपल्या सर्व सभासदांची आर्थिक वाहिनी असून, तिच्या नावलौकिकाला कोणतेही गालबोट लागू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.