नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील भाविकांच्या बसला कानपूर (उत्तर प्रदेश) जवळ शनिवारी पहाटे अपघात झाला. या अपघातात निफाडचे ट्रॅव्हलमालक, राजस्थानमधील बसचालकासह महिला भाविकाचा मृत्यू झाला आहे. तर ४६ भाविक किरकोळ जखमी झाले असून, त्यांना कानपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कानपूर येथील प्रशासनाशी संपर्क साधत भाविकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची विनंती केली. जिल्ह्यातील ओझर, पिंपळगाव, मालेगाव परिसरातील सुमारे ५० भाविक उत्तर भारतात तीर्थयात्रेसाठी खासगी यात्रा बसने गुरुवारी निघाले होते.
कानपूरजवळ पनकी पोलिस ठाणे हद्दीत रस्त्याचा कडेला उभा असलेल्या एका ट्रकला भाविकांच्या बसने मागून धडक दिली. त्यात बस रस्त्याचा बाजूला उलटली झाली. या अपघातात चालकासह बसमधील भाविक जखमी झाले. यात निफाडच्या भगीरथबाई (ओझर, वय अंदाजे ६०, पूर्ण नाव समजू शकले नाही) यांचा जागीच मृत्यू झाला. तर बसमधील इतर ४६ प्रवासी किरकोळ जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कानपूर जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर जखमींना कानपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचारादरम्यान जखमी बसचालक व पुन्हा एका भाविकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या तीन झाली होती. जखमींच्या मदतीसाठी अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत.
जिल्हा प्रशासन जखमींच्या संपर्कात असल्याचे कानपूर येथील अधिकाऱ्यांनी सांगितल्याची माहिती जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिली. निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनीही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तसेच कानपूर येथील प्रशासनाशी संपर्क साधत जखमींची विचारपूस करून त्यांच्यावर आवश्यक ते वैद्यकीय उपचार त्वरित करण्याबाबत सूचित केले आहे. नाशिक जिल्हा प्रशासनाकडून दिवसभर अपघातग्रस्तांना मदतीसाठी प्रयत्न सुरू होते. तत्काळ एका व्यक्तीला विमानाने घटनास्थळी पाठविण्यात आले आहे. ते तेथे पोहोचल्यावर अधिकची माहिती प्रशासनाला मिळू शकणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून तत्काळ मदत
भाविकांच्या बसला अपघात झाल्याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तत्काळ कानपूर येथील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधत मदतीची विनंती केली. तसेच पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधत अधिक माहिती जाणून घेतली.
तसेच निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनीही घटनेची माहिती घेत दिवसभर संबधितांना मदतीसाठी प्रयत्न, मृतदेह आणणे आदी व्यस्त होते. मृतांची नावे अशी : मृतांमध्ये ट्रॅव्हल बसमालक मनोज जाधव (कुंभारी, ता. निफाड), भगीरथीबाई (६०, ओझर) व बसचालक (रा. राजस्थान) या तिघांचा समावेश आहे.
जखमींचे नावे अशी
शोभा तुकाराम, सुशीला रासकर, अरुणा, शालिनी, मुरलीधर, शांताबाई, उषाबाई, शैला, रेखा सुतार, विद्या सावंत, शालिनीबाई, वैशाली, नर्मदा, सरला, भास्कर, हिराबाई, ताराबाई, तुकाराम, नानकी, मंदाकिनी, विलास, नंदू, इराबाई, संगीता, चिंधू, सूरज, सत्यभामा, गनसूबाई, जियाबाई, शीला, प्रमिला, रामभाऊ, सुमनबाई, सारिका राम, मुंद्रा राधेश्याम पुरकुडे, सलोनी, शोभा, जयश्री, संजय चौधरी, मीरा, श्यामराव, कमल आदींचा समावेश आहे.