जायखेडा : पुढारी वृत्तसेवा
बागलाण तालुक्यातील आनंदपूर येथील करंजाडी नदीवरील रस्ता पुरात वाहून गेल्यानंतर गावातील शेतकरी अनिल भामरे यांनी पुन्हा एकदा स्वतःच्या खर्चातून पर्यायी रस्ता तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. विद्यार्थी, शेतकरी आणि ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेऊन त्यांनी हा पुढाकार घेतला असून, या ठिकाणी कायमस्वरूपी पूल उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
करंजाडी नदीवरील हा रस्ता भामरे वस्तीतील नागरिकांसाठी महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग आहे. याच मार्गाने विद्यार्थी शाळेत जातात, शेतकरी शेतीच्या कामासाठी ये-जा करतात, तसेच ग्रामस्थांचा दैनंदिन प्रवासही याच रस्त्यावर अवलंबून आहे. मात्र, अनेक वर्षे या ठिकाणी कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत.
यापूर्वी २०१८-१९ मध्ये शासनाकडून रस्ता न झाल्याने अनिल भामरे यांनी स्वतःच्या खर्चातून सुमारे साडेपाच लाख रुपये खर्च करून रस्ता तयार केला होता. त्याचा लाभ अनेक वर्षे ग्रामस्थांना झाला. दरम्यान, शासनाने फरशी पुलाचे काम सुरू केले; मात्र अलीकडील पुरात अर्धवट पूल आणि रस्ता वाहून गेला.
या घटनेनंतर विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असल्यामुळे अनिल भामरे यांनी पुन्हा एक ते दीड लाख रुपये खर्च करून पर्यायी रस्ता तयार करण्याचे काम सुरू केले आहे. सध्या सुमारे ४० ते ५० विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत असून, शेतकऱ्यांनाही शेतीकामासाठी अडथळे निर्माण झाले आहेत.
ग्रामस्थांनी करंजाडी नदीवरील फरशी पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून या भागाला कायमस्वरूपी सुरक्षित रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
गावकऱ्यांना अडचणीत पाहावत नाही म्हणून स्वतःच्या खर्चातून रस्ता तयार करत आहे. मात्र, कायमस्वरूपी पूल उभारणे ही शासनाची जबाबदारी आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई करावी.— अनिल भामरे, शेतकरी, आनंदपूर