नाशिक : आसिफ सय्यद
सन १९७५ ते १९७७ या आणीबाणीच्या कालावधीत लोकशाहीसाठी लढा देताना कारावास भोगावा लागलेले राज्यात तब्बल ४१९० बंदिवान असून, त्यात सर्वाधिक ५६२ नागपुरातील आहेत. बुलढाण्यातील ५५० तर, पुण्यातील ५४४ असून नाशिकमधील बंदिवानांची संख्या ७८ आहे. या बंदिवानांच्या एप्रिल महिन्याच्या मानधनासाठी ६.१० कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला असून, सर्व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पात्र लाभाथ्यर्थ्यांना तातडीने वितरित केला जाणार आहे.
देशात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दि. २५ जून १९७५ ते ३१ मार्च १९७७ या दरम्यान आणीबाणी घोषित केली होती. आणीबाणीला आता ५१ वर्षे पूर्ण होत आहेत. या आणीबाणीच्या विरोधात तुरुंगवास भोगलेल्या बंदिवानांना शासनाने स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जा दिला असून, २०१८ मध्ये तत्कालीन फडणवीस सरकारने बंदिवानांना दरमहा मानधन देण्याचा निर्णय घेतला होता.
सुरुवातीला एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या बंदिवानांना मासिक दहा हजार रुपये व त्यांच्या पश्चात पत्नीस किंवा पतीस मासिक पाच हजार रुपये, तर एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक पाच हजार रुपये तसेच त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस अथवा पतीस अडीच हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे मानधन बंद करण्यात आले होते. परंतु शिंदे सरकारच्या कार्यकाळात हे मानधन पुन्हा सुरू करण्यात आले.
गेल्या वर्षी फडणवीस सरकारच्या काळात बंदिवानांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्यात आली. सद्यस्थितीत एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या बंदिवानांना मासिक २० हजार रुपये व त्यांच्या पश्चात पत्नीस अथवा पतीस दहा हजार रुपये, तर एका महिन्यापेक्षा कमी कालावधी कारावास भोगलेल्या बंदिवानांना मासिक दहा हजार रुपये व त्यांच्या पश्चात पत्नीस अथवा पतीस पाच हजार रुपये मानधन अदा केले जाते.
५५.५० कोटींची तरतूद
यंदाच्या आर्थिक वर्षात या योजनेसाठी तब्बल ५५.५० कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी एप्रिल २०२६ महिन्याचे मानधन अदा करण्यासाठी ६ कोटी १० लाख ९० हजार रुपयांचा निधी जिल्हानिहाय वितरित करण्यात आला आहे. पात्र लाभार्थ्यांना तातडीने मानधन वितरित करण्याचे निर्देश शासनाने दिले.
जिल्हानिहाय बंदिवानांची संख्या
मुबंई शहर- ४१, मुंबई उपनगर १२९, ठाणे १३४, पालघर- ११२, रायगड- ४७, रत्नागिरी ८१, सिंधुदुर्ग ४६, नाशिक- ७८, जळगाव- १७२, धुळे- ३३, नंदुरबार - २८, अहिल्यानगर १४५, पुणे-५४४, सातारा- ६१, सांगली - ८२, कोल्हापूर- ९९, छत्रपती संभाजीनगर- १४५, जालना- ६७, बीड-५६, नांदेड- १०२, हिंगोली- १४६, परभणी- ३२, लातूर- १०६, धाराशिव २६, अमरावती ८३, बुलढाणा- ५५०, यवतमाळ - ६७, अकोला - ८७, वाशीम ९, नागपूर ५६२, वर्धा १११, भंडारा- २४, गोंदिया- २१, चंद्रपूर- १०१.