नाशिक

Nashik | इगतपुरी तालुक्यातील वैतरणा धरणात ३ जण बुडाले, रेस्क्यू ऑपरेशन सुरू

अंजली राऊत

इगतपुरी (जि.नाशिक): पुढारी वृत्तसेवा – वैतरणा धरणात रविवार (दि. २६) रोजी मुंबई येथील तीन पर्यटक बुडाले असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मागील आठवड्यात भावली धरणात एकाच कुटुंबातील ५ जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच ही घटना घडल्याने गेल्या काही दिवसांमध्ये नदीत बुडून होणाऱ्या मृत्यूंमध्ये वाढ होत असल्याच्या घटना समोर येत आहे.

नाशिकच्या इगतपूरी तालुक्यातील वैतरणा धरणामध्ये तिघे बुडाले आहेत. यातील दोघेजण झारवड शिवारात तर एक जण वावी शिवारात बुडाला आहे. धरणावर फिरण्यासाठी हे तिघेही गेले होते. पाण्याचा प्रभाव जास्त असल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. इगतपुरी तालुक्यातील ही आठवडाभरातील तिसरी घटना आहे.

घोटी पोलिसांनी वैतरणा येथील स्थानिक रहिवाशी आणि माहितगार व्यक्तींकडून रविवारी रात्री (दि.२६) उशिरापर्यंत शोधकार्य सुरु केले होते. मात्र कोणाचाही रविवारी शोध लागला नाही. सोमवारी (दि.२७) पोलीसांनी सकाळपासून पुन्हा बुडालेल्या व्यक्तींचा शोध युद्धपातळीवर सुरु केला आहे. या शोध कार्यात मुंबईला पाणी पुरवठा वेगात आणि जास्त प्रवाहाने होत असल्यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. पाणी बंद करण्याचे अधिकार मुंबई महानगरपालिकेला असल्याचे स्थानिक यंत्रणेने सांगितले आहे. रविवारी दुपारी वैतरणा धरण परिसरातील झारवड शिवारात २ जण बुडाले तर एक जण वावी हर्ष शिवारात बुडाल्याची माहिती समोर येत आहे. बचाव पथक शोधकार्य करण्यासाठी सकाळ पासूनच रवाना झाली आहेत. मात्र अद्याप बुडालेल्या व्यक्तींची नावे समजली नाहीत.

निसर्गरम्य अशा इगतपुरी तालुक्यातील असलेल्या अनेक धरणातील पाण्यात बुडणे आणि महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. इगतपुरी आता अपघातपुरी आणि घातपुरी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात अपघात आणि पाण्यात बुडाल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT