नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्य शासनाकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यात येत आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात सुमारे १ लाख ४७ हजार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात १३ कोटी ५ लाखांचे अनुदान जमा झाले आहे. टप्प्याटप्प्याने उर्वरित अनुदान वर्ग केले जाणार असल्याची माहिती मिळते आहे. (onion subsidy)
संबधित बातम्या :
चालू वर्षी राज्यात अवकाळी पाऊस व अधिकचे उत्पादन यामुळे कांद्याचे दर घसरले होते. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला होता. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने प्रतिक्विंटल ३५० रुपये तसेच दोनशे क्विंटल मर्यादेपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १ फेब्रुवारी ते ३१ मार्च या दोन महिन्यांच्या कालावधीत विकलेल्या कांद्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यात येत आहे. राज्यातील ३ लाख २ हजार ४४४ शेतकरी हे कांदा अनुदानासाठी पात्र ठरले आहेत. त्यांच्यासाठी ७५५ कोटी ६४ लाखांची गरज आहे. नाशिक जिल्ह्यातील १ लाख ७३ हजारांच्या आसपास शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांना ४५३ कोटी रुपयांचे अनुदान वितरित केले जाणार आहे.
जिल्ह्यात अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे. शासनाकडून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात १० हजारांप्रमाणे जिल्ह्यातील १ लाख ४७ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर १३ कोटी ५ लाखांची रक्कम जमा झाली. उर्वरित अनुदान लवकरच वर्ग करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
१६०० शेतकरी अपात्र
मनमाड, नांदगाव पट्ट्यातील १६०० शेतकरी अनुदानासाठी अपात्र ठरले आहेत. यंत्रणेकडून सदर शेतकऱ्यांनी २०० क्विंटलपेक्षा अधिक कांदा विक्री केल्याने ते योजनेत बसत नसल्याचे सांगितले जात आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी शनिवारी (दि.१६) दिशा समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करत यंत्रणांची खरडपट्टी काढली. संबंधित शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ देण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याची सूचना केल्या.
हेही वाचा :