नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत तंत्रज्ञानाचा अवलंब करत उत्पादन वाढवावे. प्रगतशील शेतकऱ्यांनी स्वतः केलेले नावीन्यपूर्ण प्रयोग इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांनाही समृद्ध करावे, असे आवाहन खासदार भास्कर भगरे यांनी केले. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद कृषी विभाग, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, 'आत्मा', महाफेड आणि सस्टेन प्लस एनर्जी फाउंडेशनतर्फे बुधवारी (दि. १) जिल्हास्तरीय कृषी दिन सोहळा पार पडला.
त्यावेळी खासदार भगरे बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, लेखा व वित्त अधिकारी मारुती मुळे उपस्थित होते. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी कृषी कुंभअंतर्गत सादर केलेल्या विविध उपक्रमांचा खरीप हंगामात वापर करण्याचे आवाहन केले.
मृदा परीक्षण, आधुनिक सिंचन पद्धती, कृषी यांत्रिकीकरण आणि मूल्यवर्धनातून शाश्वत शेतीकडे वाटचाल करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विजय धात्रक यांनी सूत्रसंचालन केले. कृषी अधिकारी दीपक सोमवंशी व विजय केदार यांनी नियोजन केले. कृषी उपसंचालक महेश वेटेकर व तंत्र अधिकारी योजना राजपूत यांनी सहकार्य केले. वरुण पाटील यांनी आभार मानले.
उत्कृष्ट शेतकरी व अधिकाऱ्यांचा सन्मान
खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये मका, कांदा, सोयाबीन, गहू, हरभरा या पिकांत राज्यस्तरावर उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कृषी विस्तार क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला
१२ कृषी स्टार्टअप्स सादर
१२ कृषी स्टार्टअप्सने आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे प्रदर्शन केले. यात आदिवासी विकास विभागाच्या बचत गटांची प्रक्रिया केलेली उत्पादने, एसपी अॅग्रो अहिल्यानगर यांचे कांदा लागवड व फवारणी यंत्र, क्लीन एनर्जी (पुणे) यांचे बायोगॅस संयंत्र हे आकर्षणाचे केंद्र ठरले.