Malegaon Water Crisis 
नाशिक

Malegaon Water Crisis | मालेगावचा माळमाथा तहानलेलाच! 22 दिवसांनी मिळतंय पाणी; उन्हाळ्यात नागरिकांचे अतोनात हाल

Malegaon Water Crisis | नागरिकांकडून कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी

पुढारी वृत्तसेवा

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा

तहानलेल्या तालुक्यातील माळमाथा परिसरातील पंचवीसहन अधिक गावांना सध्या दर वीस ते बावीस दिवसांनी पिण्याचे पाणी मिळत असल्याने ऐन उन्हाळ्यात नागरिकांचे हाल होत आहेत. या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या दहिवाळ २५ गावे पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला वारंवार गळती लागत असून, जीवन प्राधिकरणाकडून ही गळती थांबविण्याचे प्रयत्न अपुरे ठरत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

दहिवाळ गावाजवळ जलवाहिनीला गळती लागल्याने चाळीसगाव-मालेगाव मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. यामुळे या ठिकाणी पाणी साचल्याने रस्ता निसरडा झाला आहे. यामुळे एका दुचाकीस्वाराचा अपघात होऊन तो जखमी झाला. या घटनेनंतर जलवाहिनीतील गळतीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले.

गळती दुरुस्तीचे काम सुरू असतानाच विरुद्ध बाजूस पुन्हा गळती आढळून आली. या दुरुस्ती प्रक्रियेत साधारण पंधरा दिवस उलटून गेल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला. दरम्यान, आवर्तनानुसार शेंदुर्णी व काही गावांना रविवारी (दि.२९) पाणीपुरवठा करण्यात आला.

मात्र हे पाणी दूषित व निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार नागरिकांनी केली. त्यानंतर पुन्हा चाळीसगाव-मालेगाव मार्गालगत गिगाव शिवारातील गुलजार फार्मजवळ जलवाहिनीला नवीन गळती सुरू झाल्याने या ठिकाणी पाणी वाया जात आहे.

या भागात धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतानाही माळमाथा परिसरातील गावांना दहा ते पंधरा दिवसांच्या अंतराने पाणी मिळत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

नियमित, स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी जलवाहिनीची देखभाल, दुरुस्ती व कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी माळमाथा मित्रमंडळ तसेच परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT