नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
'प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज' योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल महाराष्ट्राने देशात आपला ठसा उमटवला असून, केंद्राच्या नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडून राज्याला विविध वर्गवारीत तब्बल आठ पुरस्कारांनी गौरवण्यात आले. इतर सर्व राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला मिळालेल्या पुरस्कारांची ही सर्वाधिक संख्या असून, छतावरील सौर प्रकल्प उभारणी, जिल्हास्तरीय कामगिरी आणि 'मंथ ऑफ सोलर' मोहिमेतील उल्लेखनीय यशाची ही दखल आहे.
नवी दिल्लीतील अटल अक्षय ऊर्जा भवनात आयोजित राष्ट्रीय परिषदेत केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते महावितरणचे कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर, मुख्य अभियंता दिलीप दोडके (नागपूर) आणि अतिरिक्त कार्यकारी अभियंता राहुल सोनटक्के यांनी पुरस्कार स्वीकारले.
यावेळी ऊर्जा सचिव संतोषकुमार सारंगी उपस्थित होते. फेब्रुवारी २०२४ मध्ये सुरू झालेल्या 'पीएम सूर्यघर मोफत वीज' योजनेअंतर्गत मार्च २०२७ पर्यंत देशातील १ कोटी घरांवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत देशातील ४० लाखांहून अधिक कुटुंबांनी या योजनेचा लाभघेतला असून, महाराष्ट्रानेही अंमलबजावणीत उल्लेखनीय प्रगती साधली आहे.
राज्याचे अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली योजनेच्या अंमलबजावणीला मोठी गती मिळाल्याने महाराष्ट्राने राष्ट्रीय स्तरावर ही उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे.
महाराष्ट्रातील तीन जिल्हे महावितरणमार्फत
राज्यातील ६ लाख ५ हजार ८४७ घरांवर सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहे. या कामगिरीमुळे महाराष्ट्राने देशात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. गुजरात प्रथम, तर उत्तर प्रदेश तृतीय स्थानावर आहे. देशातील अव्वल १० जिल्ह्यांत महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांनी स्थान मिळवले आहे. नागपूर जिल्हा ८९ हजार २५५ सौर प्रकल्पांसह देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. जळगाव (४२ हजार ५७४) नवव्या आणि पुणे (४२ हजार १५१) दहाव्या क्रमांकावर आहे. पहिल्या दहामध्ये सर्वाधिक तीन जिल्ह्यांचा समावेश महाराष्ट्राचा असल्याचे विशेष मानले जात आहे.
एकाच दिवशी ४७०० घरांवर सौर प्रकल्प
मे २०२६ मध्ये राबवण्यात आलेल्या 'मंथ ऑफ सोलर' मोहिमेतही राज्याने यश मिळवले. राज्यात ६५ हजार ७८६ अर्ज प्राप्त झाले. ५४ हजार २४६ घरांवर सौर प्रकल्प कार्यान्वित केले. दोन्ही विभागांत महाराष्ट्राने देशात द्वितीय स्थान मिळवले. २९ मे रोजी देशभरात एका दिवसात सर्वाधिक १५ हजार सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले. महाराष्ट्रातच ४ हजार ७०० घरांवर सौर प्रकल्प बसवत राज्याने प्रथम क्रमांक पटकावला. याशिवाय ६९ हजार १५६ सौर प्रकल्पांची तपासणी करून महाराष्ट्र देशात अव्वल ठरला. ४१३ पुरवठादारांची नोंदणी करत द्वितीय स्थान मिळविले.