नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे बाजारभाव सातत्याने कोसळत असून, दुसऱ्या बाजूला उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे. परिणामी, शेतकरी आज नफा तर दूरच, पण उत्पादन खर्चसुद्धा वसूल करू शकत नाही.
राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. सटाणा बाजार समितीत एका शेतकऱ्याला ५० पैसे किलो असा कवडीमोल दर मिळाल्याने, त्याने उद्वेगातून आत्महत्येचा प्रयत्न केला. यासाठी तातडीने राज्य सरकारने हस्तक्षेप करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने १५०० रुपये प्रतिक्विंटल अनुदान द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली आहे.
जिल्ह्यातील सटाणा बाजार समितीत तर परिस्थिती आणखी भयावह झाली आहे. तेथे एका शेतकऱ्याच्या कांद्याला अवघा ५० रुपये क्विंटल म्हणजे ५० पैसे किलो इतका अत्यंत कमी दर मिळाला. ज्या कांद्याला पिकवण्यासाठी हजारो रुपये खर्च होतात, त्या कांद्याची किंमत आज पाण्यापेक्षाही कमी झाली आहे.
या घटनेमुळे संतप्त झालेल्या संबंधित शेतकऱ्याने बाजार समितीतच आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी संघटनेकडे दिली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतही कांद्याला अत्यंत कमी दर पुकारण्यात आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले आणि कांदा लिलाव बंद पाडले. राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये आता शेतकऱ्यांचा रोष उघडपणे दिसू लागला आहे.
शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असताना सरकार मात्र फक्त बैठका, समित्या आणि घोषणांमध्ये व्यस्त आहे. शेतकऱ्यांना आता आश्वासन नाही, तर प्रत्यक्ष निर्णय हवे आहेत. लाखो शेतकऱ्यांचा कांदा अत्यंत कमी दरात विकला गेला आहे.
अनेकांचा उत्पादन खर्चही निघालेला नाही. म्हणून अशा सर्व शेतकऱ्यांना किमान १५०० रुपये प्रतिक्विंटल अनुदान तातडीने देणे अत्यावश्यक असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी म्हटले आहे. शासनाचे निर्णय जमिनीवर दिसले पाहिजेत. अन्यथा राज्यभर शेतकऱ्यांचे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा दिघोळे यांनी दिला आहे.