नाशिक : पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राला भोंदूगिरीने किती ग्रासले याचे भयावह वास्तव मागील दोन महिन्यांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. होय, अवघ्या दोनच महिन्यांत राज्यभरातील तब्बल ३५ भोंदूंविरोधात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर, राज्यभरातील भोंदू पोलिसांच्या रडारवर असून, काही भोंदू भूमिगत झाले आहेत.
भोंदू खरात प्रकरणाला रविवारी (दि. १७) दोन महिने पूर्ण होत आहेत. या दोन महिन्यांत ३५ भोंदूंचा पर्दाफाश करण्यात आला आहे. काही ठिकाणी उत्स्फूर्त तर काही ठिकाणी अनिसच्या प्रयत्नाने गुन्हे दाखल करण्यात आले आहे. हे भोंदू सर्वच धर्मीयांमधील आहेत. धक्कादायक बाब म्हणजे भोंदूंचे पेव केवळ ग्रामीण भागातच नव्हे तर शहरातदेखील फुटल्याचे दिसून येत आहे. या भोंदूकडून महिलांचे शोषण तसेच आर्थिक फसवणुकीचे प्रकार केल्याचे समोर येत आहे. भीतीपोटी व सामाजिक प्रतिष्ठेपोटी अनेक पीडित समोर येण्यास घाबरत होत्या. खरात प्रकरणानंतर मात्र, अनेक पीडिता स्वतःहून पुढे आल्याने, या भोंदूंचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना मदत लाभली.
जनजागृतीसाठी सरकार अपयशी
अंधश्रद्धेमुळे समाजातील फसवणूक रोखण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने १८ वर्षे लढा दिला. या संघर्षानंतर २०१३ मध्ये 'महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम २०१३' हा कायदा अस्तित्वात आला. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात सरकार अपयशी ठरले असले तरी अनिसकडून मात्र सातत्याने प्रबोधन, प्रचार व प्रसार केला जात आहे.
१) अशोक कुमार खरात, नाशिक
२) गडगेबाबा राजेंद्र गडगे, संगमनेर, अहिल्यानगर
३) चेतन सुनील माळी, मूर्तीजापूर, अकोला
४) पंकज देवराम घोलप, येडगाव, पुणे
५) मोहन मामा भोसले, कुर्डूवाडी, सोलापूर
६) नाना बर्डे, आळे फाटा, पुणे
७) ऋषिकेश वैद्य, वसई, मुंबई
८) अल्ताफ रईस खान, मालाड, मुंबई
९) रिधम पांचाळ, मालाड, मुंबई
१०) गणेश शिंदे, श्रीरामपूर, अहिल्यानगर
११) अर्जुन चव्हाण ऊर्फ टनटन बाबा, नवी मुंबई
१२) विठोबा वाल्मीक जाट, सातपूर, नाशिक
१३) किसन तळपे मंदोशी, खेड
१४) महेशगिरी ऊर्फ महेश काकडे, लासलगाव
१५) अब्दुल रशीद शेख, खालापूर, रायगड
१६) इरफान नियाज अहमद, कांदिवली, मुंबई
१७) अनिल सोलोमन सिंग (पादरी), पुणे
१८) शिवराम पराश सावर, पालघर
१९) अल्ताफ हसन मदारी, जळगाव
२०) नाना ऊर्फ गुरुमाऊली वीरकर, टेंभुर्णी, सोलापूर
२१) पिंटू धुमाळ बारामती, पुणे
२२) हेमदास किसन बावणे, अड्याळ, भंडारा
२३) चंद्रकांत राजेंद्र माळी, इगतपुरी, नाशिक
२४) अशोक मधुकर आव्हाड, श्रीरामपूर
२५) औदुंबर गडदे, स्वारगेट, पुणे
२६) नवनाथ गवळी, खेड, पुणे
२७) शाहिद शेख, खडकपाडा, कल्याण
२८) शिव भाऊ सोनवणे, सर्जेपुरा, अहिल्यानगर
२९) ज्ञानेश्वर नागोराव कोरडे, बिलोली, नांदेड
३०) रमेश गुप्ता, मालाड, मुंबई
३१) हरिंगीरी दत्तगिरी महाराज, भाग्यनगर, नांदेड
३२) मंजुनाथ शेट्टी ऊर्फ दीक्षित, ठाणे
३३) भगत सुभाष चित्ते, पश्चिम देवपूर, धुळे
३४) यशवंत एकनाथ थोरात, पारनेर, अहिल्यानगर
३५) श्याम महाराज राठोड, दिघी, पुणे
"ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातदेखील भोंदूगिरीचे प्रकार सुरू असल्याचे दाखल गुन्ह्यांवरून स्पष्ट होते. बहुतांश सर्वच धर्मांत गुन्हे दाखल झाल्याने, हिंदू धर्मांतच अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम होते, हा काहींचा दावा फोल ठरला आहे."- कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, अनिस