नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकची वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढणारी गर्दी, त्यामुळे उद्भवणारी वाहतुक कोंडी, प्रवाशांची घनता लक्षात घेता भविष्यकालिन वाहतुक नियोजनासाठी सार्वजनिक परिवहन व्यवस्थेच्या सक्षमीकरणाची आवश्यकता अधोरेखित करताना नाशिकमध्ये नियमित मेट्रो सुरू करण्यास वाव असल्याचा सर्वेक्षण अहवाल महामेट्रोने सोमवारी(दि.२३) नाशिक महापालिकेला सादर केला.
नाशिकच्या २०५६ पर्यंतच्या लोकसंख्येसाठी वाहतुक नियोजनाकरीता आवश्यक उपाययोजनांचा आराखडा या अहवालात नमूद करण्यात आला आहे. दरम्यान, आगामी सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेता सुधारणांसह अहवाल सादर करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी महामेट्रोला केल्या आहेत.
नाशिकमध्ये मेट्रो निओ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु राजकीय आणि प्रशासकीय अनास्थेमुळे हा प्रकल्प डब्यात गेला. आता सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शहरातील अभूतपूर्व वाहतुक कोंडी, वाहतुक सक्षमीकरणाचा मुद्दा चर्चेत आला आहे.
या पार्श्वभूमीवर महामेट्रोचे वरिष्ठ अतिरीक्त महाव्यवस्थापक विकास नागुलकर, सहाय्यक व्यवस्थापक साकेत केळकर यांनी नाशिकचा सर्वंकष वाहतुक आराखड्यासंदर्भातील सर्वेक्षण अहवालाचे महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात सादरीकरण केले. एनएमआरडीचे आयुक्त जलज शर्मा, महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, वाहतुक कक्षाचे कार्यकारी अभियंता रविंद्र बागुल आदी यावेळी उपस्थित होते.
नाशिकमधील रस्त्यांची स्थिती, वाहनांची संख्या, वाहतुक कोंडीची ठिकाणे, कारणे, भविष्यातील गरजा, उपाययोजना अहवालात नमूद करण्यात आल्या आहेत. शहरातील सार्वजनिक परिवहन व्यवस्थेच्या सक्षमीकरणाच्या उपायोजना सुचविताना रस्ते बांधणीतही काही बदल आवश्यक असल्याचे महामेट्रोने सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. आयुक्त खत्री यांनी या अहवालात काही सुधारणा सुचविल्या असून त्यानुसार आठवडाभरात नवीन अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
नियोजनाअभावी वाहतुक कोंडी
नाशिक शहराची विद्यमान लोकसंख्या २३ लाखांच्या घरात असून २०५६ पर्यंत ही लोखसंख्या दुपटीने वाढून ४६ लाखांपर्यंत पोहोचेल. नाशिकमध्ये सद्यस्थितीत १९ लाख वाहने रस्त्यावर असून विकसित भागाच्या तुलनेत दहा टक्के भूभाग हा वाहतुक सुविधेसाठी वापरला जात आहे. मात्र, वाहतुकीचे योग्य नियोजन नसल्यामुळे वाहतुक कोंडीसारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.
वर्षभरात ५७ पादचाऱ्यांचा मृत्यू
नाशिकमध्ये गेल्या वर्षभरात विविध अपघातांमध्ये १९७ जणांचा मृत्यू ओढावला असून यात ५७ जण पादचारी होते, असे सर्वेक्षणातून समोर आले असून पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजनांची गरज असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. २८ ठिकाणी फुटपाथचे सर्वेक्षण करण्यात आले असून शहरात अशोकस्तंभ, रविवार कारंजा भागात सर्वाधिक पादचारी रस्त्यावर असल्याचे आढळून आले.
तीन टप्प्यात उपाययोजना
महामेट्रोकडून सादर करण्यात आलेल्या या अहवालात तीन टप्प्यात वाहतुक सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत. त्यात पहिल्या टप्प्यात तातडीने करावयाची कामे, अल्प मुदतीतील सुधारणा तसेच दिर्घ मुदतीतील सुधारणांचा समावेश आहे. यात नाशिकमध्ये परिवहन व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी नियमित मेट्रो सारख्या पर्यायांचा वापर केला जाऊ शकतो, असे नमूद करण्यात आले आहे.