नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदी मच्छिंद्र बाळासाहेब सानप यांची बिनविरोध निवड होताच शहराच्या आर्थिक निर्णयप्रक्रियेची घ्रा तरुण नेतृत्वाकडे आली आहे. स्थायी समितीचे ते ३९वे सभापती ठरले असून, आगामी काळात महापालिकेच्या अर्थकारणावर त्यांची निर्णायक छाप राहणार आहे.
राजकारणाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. माजी महापौर तथा माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे ते सुपुत्र आहेत. त्यामुळे संघटन, निवडणूक आणि प्रशासकीय व्यवहार यांचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना लहानपणापासूनच मिळत गेला. महापालिकेच्या सातव्या पंचवार्षिक निवडणुकीत ते सलग दुसऱ्यांदा निवडून आले, यापूर्वी २०१७ मध्ये पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भाजपच्या तिविकटावर त्यांनी विजय मिळवला होता.
प्रभागातील पाणीपुरवठा, रस्ते, गटारे, सार्वजनिक सुविधा यांसाठी सातत्याने पाठपुरावा करत त्यांनी स्थानिक पातळीवर सक्रीय नगरसेवक म्हणून काम केले आहे. महापालिकेतील विविध समित्यांमधील त्यांचा अनुभवही उल्लेखनीय आहे. पंचवटी प्रभाग समितीचे सभापतिपद त्यांनी भूषवले आहे.
वृक्षप्राधिकरण समिती तसेच विभागीय क्रीडा संकुल समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. उत्तर महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्राशीही त्यांचा संबंध राहिला असून, इंडिया स्पोर्टसच्या कार्यकारिणीत त्यांनी सहभाग नोंदवला आहे. संघटन पातळीवर भाजप ओबीसी युवा मोर्चाच्या विभागीय अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे.
सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांमध्येही त्यांची उपस्थिती लक्षणीय राहिलो आहे. औराम रथोत्सव, नवरात्रोत्सव, कृष्ण जन्मोत्सव, गणेशोत्सव यांसारख्या उत्सवांत ते सक्रिय सहभागी राहिले आहेत.
यामुळे राजकारणासोबतच सामाजिक बांधिलकी जपणारे नेतृत्व अशी त्यांची प्रतिमा तयार झाली आहे. स्थायी समितीचे सभापती म्हणून त्यांच्यासमोर मोठी जबाबदारी आहे. कोट्यवधींच्या विकासकामांना मंजुरी देणे, निविदा प्रक्रियेवर देखरेख ठेवणे आणि महापालिकेच्या आर्थिक शिस्तीची काळजी घेणे या सर्व निर्णयांमध्ये त्यांची भूमिका केंद्रस्थानी असेल, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या नियोजनबद्ध विकासाची ग्वाही त्यांनी दिली असून, पायाभूत सुविधा सक्षम करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.