पिंपळनेर,(साक्री): तालुक्यातील वागदर शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्यांच्या दहशतीने शेतकरी ग्रासले असतानाच,मंगळवारी एकाच वेळी चार बिबट्यांचे दर्शन झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शेतात मका कापणी करणाऱ्या मजुरांच्या दिशेने हे बिबटे धावून आल्याने मजुरांची मोठी पळापळ झाली.या घटनेनंतर वनविभागाच्या ढिम्म कारभारावर संताप व्यक्त करत शिवसेना जिल्हाध्यक्ष डॉ. तुळशीराम गावित यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
शेतकरी दिपेश गांगुर्डे यांच्या शेतात मंगळवारी मका कापणीचे काम सुरू होते.दुपारी काम सुरू असतानाच अचानक डोंगराच्या दिशेने दोन मोठे आणि दोन लहान असे एकूण चार बिबटे वेगाने खाली येत असल्याचे मजुरांच्या निदर्शनास आले. साक्षात काळ समोर उभा ठाकल्याचे पाहून मजुरांनी काम अर्धवट सोडून जीवाच्या आकांताने शेताबाहेर धाव घेतली.बिबटे दरम्यान,पळापळ आणि आवाजामुळे देखील घाबरुन दुसरीकडे निघून गेले.तेथून या घटनेमुळे मजुरांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. मजुर आता त्या भागात काम करण्यासाठी जाण्यास तयार नाही, त्यामुळे दुपारी या परिसरातील शेतकऱ्यांनी तातडीने एकत्र येत वनविभागाकडे धाव घेतली.
लोकप्रतिनिधींचा वनविभागाला घेराव
पिंपळनेरचे नगरसेवक गणेश खैरणार यांनी तातडीने शिंदेसेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुळशीराम गावित यांना पाचारण केले.डॉ.गावित यांनी पिपळनेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय ढोले यांची भेट घेऊन प्रशासनाच्या संथ कारभाराचा पाढाच वाचला.
शेतकरी गेल्या दोन महिन्यांपासून मृत्यूच्या सावटाखाली जगत आहेत.वनविभागाला नेमकी कसली प्रतीक्षा आहे? डॉ.गावित यांनी डीएफओ नायकवाडी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला.त्यांनी वागदर शिवारातील भीषण परिस्थिती मांडत तातडीने पिंजरा लावण्याचे आदेश देण्याची मागणी केली. जर काही अनुचित प्रकार घडला,तर त्याला सर्वस्वी वनविभाग जबाबदार राहील,असा इशाराही त्यांनी दिला.