Igatpuri Ambewadi Landslide pudhari photo
नाशिक

Igatpuri Ambewadi Landslide | आंबेवाडीत भूस्खलन; माळीण दुर्घटनेची आठवण

Igatpuri Ambewadi Landslide | या दुर्घटनेत डोंगराचा मोठा भाग कोसळल्यामुळे माळीण दुर्घटनेची आठवण करून देणारी परिस्थिती निर्माण झाली.

पुढारी वृत्तसेवा

  • पावसामुळे उंबरदरा - खरलेचा कडा कोसळून भातशेतीसह वनपट्टे नेस्तनाभूत

  • सुदैवाने जीवितहानी टळली

घोटी : पुढारी वृत्तसेवा

इगतपुरी तालुक्यात मुसळधार अतिवृष्टीमुळे शुक्रवारी (दि. २४) मध्यरात्री २ च्या सुमारास उंबरदरा - खरलेचा कडा परिसरात दोन डोंगरांच्या मधून वाहणाऱ्या झाऱ्यालगत भीषण भूस्खलन झाले. या दुर्घटनेत डोंगराचा मोठा भाग कोसळल्यामुळे माळीण दुर्घटनेची आठवण करून देणारी परिस्थिती निर्माण झाली.

भूस्खलनामुळे उंच डोंगरावरील सुमारे १५ ते २० फूट लांबी - रुंदीचे मोठे दगड, प्रचंड झाडे मुळासकट कोसळून डोंगराचा मोठा भाग सुमारे ५०० ते ७०० मीटरपर्यंत खाली घसरला. परिणामी डोंगर पायथ्याशी असलेल्या १५ ते २० आदिवासी शेतकऱ्यांच्या भात लागवडीच्या शेतजमिनी व वनपट्टे पूर्णपणे मातीखाली गाडले गेले.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी घटनास्थळी न जाता सुरक्षिततेसाठी गावाकडे धाव घेतल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे शेतीचे नुकसान झाले असून, अनेक कुटुंबांचे उपजीविकेचे साधनच हिरावले गेले आहे.

दरम्यान, बुधवारपासून परिसरातील वीजपुरवठा खंडित झालेला असून, मोबाइल नेटवर्कही पूर्णपणे बंद असल्यामुळे नागरिकांचा बाहेरील जगाशी संपर्क तुटला. त्यामुळे प्रशासनालाही घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाला. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अभिजित बारावकर, तालुका कृषी अधिकारी रामदास मडके, एफडीसीएमचे मयूर धोटे, मंडळ अधिकारी महेश वाघ, तलाठी वंदना चौधरी, ग्रामविकास अधिकारी मनीषा कलंकार तसेच सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

तहसीलदार बारावकर यांनी ड्रोनद्वारे संपूर्ण नुकसानीचे चित्रीकरण करून, महसूल, कृषी, वन व ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना संयुक्त पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले.

याशिवाय भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी के. टी. बंधारा, गॅबियन वॉलसारख्या उपाययोजनांचे प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. एनडीआरएफ व एसडीआरएफ शासन निर्णयानुसार संयुक्त पंचनामे करून नुकसानभरपाईचा प्रस्ताव सादर केला जाणार असल्याची माहिती तहसीलदार बारावकर यांनी दिली.

आमदार माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून शेतजमिनीचे लेव्हलिंग, गॅबियन वॉल उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा तसेच शासनाकडून जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी सांगितले.

पाहणीवेळी कृषी सहायक शांताराम गभाले, माजी सरपंच चित्रकला केंकरे, चिंतामण जाधव, रामदास जाधव, गौतम डोळस, नामदेव डोळस, गीताबाई केंकरे, लक्ष्मण करटुले, चंदू रूपवटे, गणेश रूपवटे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. ज्येष्ठ शेतकऱ्यांनीही 'आजपर्यंत असा डोंगर कधीच कोसळला नव्हता', अशी भावना व्यक्त करत ही तालुक्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी भूस्खलनाची घटना असल्याचे सांगितले.

२० फूट मातीखाली गाडली गेली भातशेती

"भूस्खलनात आमची भातलागवडीची जमीन पूर्णपणे वाहून गेली. मोठमोठे दगड, झाडे व मातीखाली पीक जवळपास २० फूट खोल गाडले गेले आहे. जमीन पूर्ववत करण्यासाठी शासनाने मदत करावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी नामदेव डोळस यांनी केली."

सरकारने आम्हाला तातडीने मदत करावी : जाधव

"आमच्या वाडवडिलांच्या हयाततीत असा डोंगर कधीच कोसळला नव्हता. इतके मोठे नुकसान आम्ही कसे सहन करायचे? सरकारने आम्हाला जगण्यासाठी तातडीने मदत करावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी शिवाजी जाधव यांनी केली."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT