नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात पावसाने दांडी मारल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले असतानाच हवामान विभागाने सोमवारी (दि. २२) जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे जिल्हाभरात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना तसेच पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचे वातावरण तयार होत असले, तरी प्रत्यक्ष पावसाची प्रतीक्षा कायम आहे. सोमवारी जिल्ह्यातील बहुतांश घाटमाथा परिसरात पावसाने हजेरी लावली. त्र्यंबकेश्वरसह काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या.
मात्र, अनेक ठिकाणी दिवसभर ऊन सावलीचा खेळ सुरू राहिला. ढग दाटून येत असूनही पावसाने अनेक भागांना हुलकावणी दिली. पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यावर परिणाम झाला आहे. शहरातील पाणीपुरवठ्यावरही त्याचा परिणाम जाणवत असून, नागरिकांना पाणीकपातीला सामोरे जावे लागत आहे.
दुसरीकडे खरीप हंगामातील पेरण्या लांबणीवर गेल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. यंदा मान्सूनच्या सुरुवातीला झालेल्या विलंबामुळे शेतीचे नियोजन कोलमडले आहे. प्रशांत महासागरातील अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.
सोमवारी नाशिक जिल्ह्यात कमाल तापमानात काहीशी घट झाली असून, हवामान विभागाने ३४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली. काही भागांत ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाटही झाला. मात्र, अपेक्षित पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांच्या नजरा अजूनही आकाशाकडे लागून आहेत.