इगतपुरी / नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भावली परिसरात पर्यटकांना मारहाण करून फरार झालेल्या मुख्य तीन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. कैलास भागडे, आकाश भोईर व तुषार कडू अशी या टवाळखोरांची नावे आहेत.
भावली धरण धबधब्यावर पर्यटनासाठी गेलेल्या कुटुंबाला येथील टवाळखोरांच्या टोळीने १५ ते २० किलोमीटर पाठलाग करीत मारहाण केल्याची गंभीर घटना रविवारी (दि. १२) घडली होती. यातील नऊ संशयितांना दोन दिवसांपूर्वीच अटक झाली आहे.
मात्र, मारहाण केलेले तीन मुख्य संशयित फरार होते. या आरोपींना पकडण्यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक घनश्याम बळप व गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल मोरे यांनी आरोपींच्या शोधासाठी नाकाबंदी व गस्त वाढविली होती.
दरम्यान, मुंढेगाव परिसरात गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीवर काही तरुण फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी या तिघांना अटक केली.
ही कारवाई पोलिस निरीक्षक घनश्याम बळप, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल मोरे, सहायक पोलिस निरीक्षक कांचन भोजने, अमोल गायधनी, उपनिरीक्षक शैलेश पाटील, गणेश परदेशी, गोपनीय विभागाचे हवालदार नीलेश देवराज, प्रवीण काकड, अभिजित पोटिंदे, विलास धारणकर, मधुकर पवार, करण ठाकूर यांच्या पथकाने केली.
अटकेत असलेल्या सर्व १२ संशयितांची वैद्यकीय तपासणी गुरुवारी (दि. १६) इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. त्यानंतर या सर्वांची पुन्हा इगतपुरी शहरातील मुख्य रस्त्यावरून धिंड काढण्यात आली.
यावेळी पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांनी सांगितले की, कायदा व सुव्यवस्था कोणी मोडण्याचा प्रयत्न केल्यास, त्याची गय केली जाणार नाही. टवाळखोरांची धिंड काढल्याने इगतपुरीकरांनी समाधान व्यक्त केले आहे.