नाशिक : पुढारी वृत्तसेवा
इराण-अमेरिका युद्धामुळे राज्यात निर्माण झालेल्या गॅस तुटवड्याच्या मुद्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. केंद्र व राज्य सरकार एक संघ म्हणून हा प्रश्न हाताळण्यास अपयशी ठरत आहे. देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवर राष्ट्रीय पातळीवर संवाद होत नाही.
पंतप्रधानांनी विरोधकांना एकत्र घेऊन निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अमेरिकेसोबत झालेल्या व्यापार करारामुळे इंधन क्षेत्रावर दबाव निर्माण होत असल्याचा आरोप करत काँग्रेस या मुद्यावर संघर्षाची भूमिका घेईल, असेही सपकाळ यांनी सांगितले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची दोन दिवसीय कार्यशाळा नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे झाली.
कार्यशाळेच्या उद्घाटनापूर्वी प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सपकाळ म्हणाले की, नाशिक येथे काँग्रेसच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवलेल्या पदाधिकाऱ्यांसाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
या कार्यशाळेच्या माध्यमातून राज्यभरातील कार्यकर्त्यांना संघटनेत अधिक सक्रियपणे सामावून घेण्याचा प्रयत्न आहे. पुढील वर्षभरात पक्षाचा ठोस कृती कार्यक्रम राबविण्यात येणार असून, त्यासाठी अशा कार्यशाळा महत्त्वाच्या ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. विधानभवन परिसरात बॉम्ब संदर्भातील चर्चावर सपकाळ म्हणाले की, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक आहे.
असे प्रकार विधान भवनापर्यंत पोहोचत असतील तर ती गंभीर बाब आहे. अफवा पसरवणे थांबवून सरकारने कायद्याचे राज्य प्रस्थापित करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. पोलिसांनी सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या तत्त्वानुसार काम करावे, मात्र सध्या खलप्रवृत्तींचे संरक्षण होत असून, सज्जनांना त्रास दिला जात असल्याची टीकाही त्यांनी केली. यावेळी प्रदेश सचिव सचिन सावंत, प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, जिल्हाध्यक्ष भारत टाकेकर, रमेश कहांडोळे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांना टोला
माजी मंत्री परिणय फुंके यांच्या टीकेबाबत सपकाळ म्हणाले की, ज्ञानाची मक्तेदारी आमच्याकडेच आहे, असा अहंकार सत्ताधाऱ्यांमध्ये गेल्या काही वर्षांत दिसून येतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकालाही ज्या मानसिकतेने विरोध केला गेला, त्याच मानसिकतेतून ही टीका होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांच्या संघर्षातून तयार झालेल्या परंपरेतून आपण कार्य करत आहोत. तसेच त्र्यंबकेश्वरच्या भूमीतून देवेंद्र फडणवीस यांना सुबुद्धी मिळावी, अशी प्रार्थना करणार असल्याचेही त्यांनी म्हटले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या 'छोटे दिल से कोई बडा नहीं होता' या वाक्याचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी आत्मचिंतन करावे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.