नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अभियंता व अग्निशमन संवर्गातील ३०० पदांच्या नोकरभरतीसाठी नाशिक महापालिकेने टीसीएसमार्फत घेतलेल्या परीक्षेतील प्रश्नावलीवर ३५७ आक्षेप दाखल झाले आहेत. या आक्षेपांची नियमानुसार पडताळणी केली जात असून, पुराव्यांच्या आधारे तथ्य तपासून उत्तरतालिकेत आवश्यकतेनुसार बदल केला जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
नाशिक महापालिकेतील अभियंता संवर्गातील ११४, तर अग्निशमन विभागातील फायरमन व वाहनचालकांच्या १८६ पदांसाठी टीसीएसमार्फत नोकरभरतीची प्रक्रिया राबवली जात आहे. महापालिकेत २४ वर्षांनंतर भरती प्रक्रिया होत असल्यामुळे या भरतीकडे संपूर्ण लक्ष लागले आहे.
एकूण ३०० पदांच्या या भरतीसाठी १९ हजार ४९८ जणांचे अर्ज महापालिकेकडे प्राप्त झाले होते. या भरतीसाठी २४ व २५ फेब्रुवारीस राज्यातील १३ शहरांत २९ केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात आली. यासाठी १९,४९८ उमेदवारांनी अर्ज दाखल केल होते. त्यापैकी १५,५८२ उमेदवार लेखी परीक्षा दिली.
गैरप्रकार न होता परीक्षा सुरळीत पार पडली. टीसीएसच्या माध्यमातून ही परीक्षा घेण्यात येत असली तरी त्यावर महापालिकेचे नियंत्रण असावे, यासाठी मनपाच्या ६० अधिकारी, कर्मचाऱ्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. परीक्षेनंतर उमेदवारांना प्रश्नावरील आक्षेपांसाठी मुदत देण्यात आली होती. निर्धारित मुदतीत टीसीएसकडे ३५७ आक्षेप प्राप्त झाले. आक्षेप पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निकालाची गुणवत्तायादी जाहीर केली जाईल.
महापालिका नोकरभरतीसाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेतील प्रश्नावर टीसीएसकडे ३५७ आक्षेप प्राप्त झाले आहेत. पुराव्यांच्या आधारे तथ्यांची पडताळणी करत आवश्यकतेनुसार उत्तर तालिकेत बदल केला जाईल.
-लक्ष्मीकांत साताळकर, उपायुक्त, मनपा