

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आखाती देशातील युद्धामुळे उडालेला गॅसटंचाईच्या भडक्यामुळे शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागालाही झळ बसली आहे. मात्र, ग्रामीण भागात मुबलक सरपण उपलब्ध होत असल्याने गॅस नाही तर काय झाले, चूल तर आहे ना, असे म्हणत ग्रामीण भागात आता चुली पुन्हा पेटू लागल्या आहेत. शहरीकरणाबरोबरच ग्रामीण भागाचाही विकास झपाट्याने होत आहे.
ग्रामीण भागातील मोठ्या गावांना तर शहरीकरणाचा लुक प्राप्त झाला आहे. शहराप्रमाणेच सिमेंट काँक्रीटच्या इमारती, रस्ते, लाइफस्टाईल आणि घरातील किचनही हायटेक झाले आहेत. शिक्षणाचा वाढत्या टक्क्यामुळे मुलींचे म्हणजेच महिलांचा शिक्षणातला टक्का वाढला आहे.
त्यामुळे शहरी लाइफस्टाईल ग्रामीण भागातही फोफावली आहे. त्यामुळे गॅस सिलिंडर हा महिलांचा किचनमधला अविभाज्य घटक आहे. सधन शेतकरी असो की, नोकरवर्ग यांच्या घरात सिलिंडर आहेतच, मात्र शासनाने उज्ज्वला योजनेंतर्गत गरीब मजुरांच्या घरातही गॅस सिलिंडर पोहोचला आहे. त्यामुळे साहजिकच ग्रामीण भागातही सिलिंडरचा वापर वाढला आहे.
त्यामुळे गॅस वितरकांकडेही ग्राहक वाढले आहेत. मात्र, ग्रामीण भागातील मजूरवर्ग दरमहा गॅस सिलिंडर भरण्यासाठी खर्च करण्यापेक्षा शेती व मोकळ्या जागेतील झुडपे आणि झाडांपासून मुबलक सरपण मिळते म्हणून अनेक जण दररोज चुलीचा वापर करतात. मात्र, मध्यमवर्गीय शेतकरी-नोकरदार कुटुंबातील महिला-मुलींना गॅसवरच स्वयंपाक करणे आवडते.
त्यामुळे सध्याच्या आखाती देशातील युद्धाची झळ ग्रामीण गृहिणींनाही बसली आहे. मात्र, सिलिंडर संपला, एक महिन्याने नवीन मिळेल म्हणून हताश न होता घराच्या ओसरीत, मोकळ्या जागेत किंवा घराच्या कोपऱ्यात असलेल्या मातीच्या चुली पुन्हा सज्ज झाल्या आहेत. ग्रामीण भागात महिला आता चुलीवरच स्वयंपाक करतानाचे चित्र आहे.
हॉटेल्समध्येही पेटल्या दुर्लक्षित भट्टया
हॉटेल म्हटले म्हणजे तेथे भट्टी आलीच. मात्र, काळानुरूप बदलामुळे भट्टया ग्रामीण भागातील हॉटेल्समध्ये अपवाद वगळता कुठेच दिसत नाहीत. व्यावसायिक सिलिंडरमुळे प्रत्येक हॉटेल व्यावसायिक सिलिंडरचा वापर करतात.
मात्र, सध्याचा गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे शहरी भागातील व भरवस्तीतील हॉटेल्समध्ये भट्टी पेटविणे शक्य नसले तरी शहराबाहेरील महामार्गांवर किंवा ढाब्यांवर मात्र व्यावसायिकांनी मातीच्या भट्टया तयार करून त्यात कोळसा किंवा लाकडाचे तुकडे आणि शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करून स्वयंपाक व अन्नपदार्थ तयार केले जात आहेत. भट्टीची चव म्हणजे न्यारीच असते. म्हणून खवय्येही अशा हॉटेल्समध्ये जाऊन जेवणाचा आस्वाद घेण्यास अधिक पसंती देताना दिसत आहेत.