नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अयोध्येतील राम मंदिर लूटप्रकरणी काँग्रेसने छेडलेले आंदोलन चिरडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ढगफुटीची अफवा पसरविली. कुठलाही धोका नसताना नाशिक - त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटी होणार असा फुगवटा त्यांनी तयार केला, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. यावेळी त्यांनी राम मंदिर लूट प्रकरणात जर आदिवासी, मागासवर्गीय अथवा अल्पसंख्याक समाजाचा कोणी आरोपी असता, तर त्यांच्या घरावर लगेचच बुलडोझर चालवला असता, त्यामुळे आता चंपत राय व अनिल मिश्रांच्या घरावर बुलडोझर कधी चालवणार? असा प्रश्नही त्यांनी व्यक्त केला.
राम मंदिर लूटप्रकरणी काँग्रेसने मंगळवारी (दि. ७) श्री काळाराम मंदिराबाहेर 'रापत राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन केले. या आंदोलनात सहभागी झालेल्या प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी माध्यमांशी बोलताना भाजप सरकारवर गंभीर आरोप केले. सपकाळ म्हणाले की, देशाचा कारभार पारदर्शकपणे चालला प्रादिजे मात्र, या सर्वांना तिलांजली मिळाली आहे. माहिती अधिकाराचा भंग यांनी केला आहे.
स्वतःचे बगलबच्चे राम मंदिरात बसविले आणि त्यावर डल्ला मारला आहे. सोन्या चांदीच्या दागिन्यांसह पैसे चोरी गेले, याचा तपास लागला पाहिजे ही आमची मागणी असून, त्यासाठी आम्ही हे सत्याग्रह आंदोलन केले. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर महाराष्ट्रात व्यापक स्वरूपात आंदोलन उभारू असा इशाराही त्यांनी दिला. तसेच राम मंदिर आंदोलनातील प्रमुख चेहऱ्यांनी भीती व्यक्त केली आहे.
खरे बोलले, तर त्यांना मृत्यूची भीती आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून चौकशीला हे सरकार का घाबरत आहे का? एसआयटीमध्ये बदमाश भरलेले आहेत. चंपत राय यांच्याविरोधात बोलायला सगळे घाबरत आहेत, हे सर्व एक थाली के चट्टे-बट्टे आहेत. जो चोर आहे, त्याला विश्वस्त मंडळात का ठेवले आहे? हा पैसा फोडाफोडीसाठी वापरला गेला आहे हे दुर्दैवी असल्याचेही ते म्हणाले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना, फडणवीस हे महाराष्ट्राचे 'सुलतान' असून, त्यांना शेतकऱ्यांशी काही देणे-घेणे नसल्याचे त्यांनी म्हटले
एसआयटीमध्ये मोदींचे हस्तक
पंतप्रधान देश विकायला निघाले आहेत. मंदिर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. एसआयटीची घोषणा केली. मात्र, या एसआयटीमध्ये पंतप्रधानांचे हस्तक आहेत. भाजप परिवारातील अनेक लोकांना ही चोरी माहीत आहे पण ते बोलत नाहीत. रामालाच लुटल्याने तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे, पण आतापर्यंत पंतप्रधान व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चकार शब्द काढलेला नाही. या दरोड्याची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत करून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, ही आमची मागणी असल्याचेही सपकाळ म्हणाले.