नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणातून १२ हजार ६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, गोदावरीवरील होळकर पुलाजवळून सध्या १९ हजार ७९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
यात गुरुवारी (दि. २३) रात्रीपर्यंत वाढ होऊन नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेत नदीकाठ परिसरात थांबू नये तसेच पोलिस, महानगरपालिका आणि अग्निशमन दलाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेद्वारे केले आहे.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे उपस्थित होते. गोदावरी नदीतून ६२ हजार क्युसेक विसर्गाचा उच्चांक आहे. २००८ मध्येही ४२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.
दरम्यान, संभाव्य परिस्थिती लक्षात घेत महानगरपालिका, पोलिस दल सतर्क झाले असून, सराफ बाजार परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सायखेडा, चांदोरी परिसरात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, निफाडचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे परिस्थितीवर लक्ष ठेवून तळ ठोकून आहेत.
गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असताना नाशिक शहर परिसरातही मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. या पूरपरिस्थितीची पाहणी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दुपारी केली. यावेळी त्यांच्या समवेत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह उपमहापौर विलास शिंदे उपस्थित होते. यावेळी त्यांनी यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले की, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पावसाने गोदावरीच्या पातळीत वाढ झाली असून, कश्यपी धरण ७१, गौतमी गोदावरी धरण ९० टक्के भरल्याने गंगापूर धरणातही आवक वाढून गंगापूर ९७ टक्के भरले आहे.
त्यातून धरणातून नदीत १२ हजार ६०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. याबरोबरच नदी, नाले दुथडी वाहत असल्याने होळकर पुलाजवळ १९ हजार ७९ क्युसेक पाण्याचा प्रवाह सुरू आहे. त्यात गोदावरी धोक्याची पातळी म्हणजे २४,००० क्युसेकचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.