नाशिक : 'इन्कलाब जिंदाबाद', 'हम लेके रहेंगे आझादी', 'नेताओं के नाम पर गद्दारो की भरमार है' अशा घोषणा देत 'जेन झी'ने कॅनडा कॉर्नर ते सीबीएसपर्यंतचा मार्ग दणाणून सोडला. नीट पेपर फुटीप्रकरणी दिल्लीच्या जंतर मंतरवर लोकशाही पद्धतीने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या 'टॉर्च मार्च' मधून विद्यार्थी, तरुणांनी तीव्र संताप व्यक्त करीत केंद्र सरकारचा तीव्र निषेध केला. यावेळी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली.
ऑल इंडिया स्टुडन्ट फेडरेशनच्या वतीने शुक्रवारी (दि. २४) हा टॉर्च मार्च काढण्यात आला. यात मोठ्या संख्येनी विद्यार्थी, तरुण हातात तिरंगा झेंडा, सरकारचा निषेध करणारे फलक आणि घोषणा देत सहभागी झाले होते. शिक्षणाचा हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही वाचविण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो असल्याचे टॉर्च मार्चमध्ये सहभागी झालेल्या तरुणांनी सांगितले.
शिक्षणमंत्री प्रधान यांचा जोपर्यंत राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत तरुणाईचा हा उद्रेक कायम राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ राजीनामा घ्यावा अन्यथा नाशिकमधील तरुणाई दिल्लीतील जंतर मंतरवर धडकेल, असा निर्धारही तरुणांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे राष्ट्रगीताने मार्चचा समारोप करण्यात आला. मार्चमध्ये डॉ. डी. एल. कराड, तानाजी जायभावे, राजू देसले, प्राजक्ता कापडणे, राज्य सहसचिव तल्हा शेख आदी सहभागी झाले होते.
पोलिसांचा मोठा फौजफाटा
टॉर्च मार्चच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन केले. तर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत, कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेतली. कॅनडा कॉर्नर ते सीबीएसपर्यंत पोलिसांची मोठी साखळीच दिसून आली.
वाहतुकीची कोंडी
टॉर्च मार्चमुळे पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन करीत, कॅनडा कॉर्नर ते सीबीएस या मार्गावरील वाहतूक अन्यत्र वळविली होती. मात्र, अशातही काही वाहनधारकांनी या मार्गावर वाहने वळविल्याने, काही काळ कोंडी निर्माण झाली होती. यावेळी पोलिसांनी वाहतुकीचे योग्य नियोजन करीत, वाहतूक अन्यत्र वळविली.