नाशिक

Ekadashi Ashadi Vari | पाऊले चालती पंढरीची वाट; हजारो वारकऱ्यांचा सहभाग

अंजली राऊत

Ekadashi Ashadi Vari : रिमझिम पावसात संत निवृत्तिनाथांच्या पालखीचे प्रस्थान झाले असून यामध्ये हजारो वारकरी विठ्ठलनामामध्ये तल्लीन होत सहभागी झाले आहेत. त्यांचा पहिला मुक्काम पेगलवाडी फाट्यावर राहणार आहे.

त्र्यंबकेश्वर (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – धुक्याने वेढलेला ब्रह्मगिरी, रिमझिम पावसात, टाळ मृदुंग अन् विठूनामाच्या गजरात हजारो वारकऱ्यांच्या मांदियाळीत गुरुवारी (दि.२०) संत निवृत्तिनाथ महाराजांची पालखी आषाढ वारीसाठी श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. तेव्हा वारी टळलेल्या भाविकांनी, 'एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार..' हा संत तुकारामांचा अभंग गात हात जोडले. दुपारी ३ च्या सुमारास पालखीने प्रस्थान ठेवले. दोन किमी अंतरावर असलेल्या प्रयागतीर्थ पेगलवाडी फाटा महानिर्वाणी आखाडा येथे पालखीचा पहिला मुक्काम पडला.

दुपारी दोनच्या सुमारास पालखी प्रस्थानासाठी खासदार राजाभाऊ वाजे, ज्येष्ठ नेते संपतराव सकाळे यांच्यासह जिल्हाभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थिती लावली. विश्वस्त मंडळाच्या अध्यक्ष कांचन जगताप, सचिव अमर ठोंबरे, जीर्णोद्धार समन्वयक नीलेश गाढवे, पालखी सोहळाप्रमुख नारायण महाराज मुठाळ, प्रसिद्धिप्रमुख नवनाथ महाराज गांगुर्डे, ॲड. सोमनाथ घोटेकर, माधव राठी, जयंत गोसावी, श्रीपाद कुलकर्णी, राहुल साळुंके यांसह सर्व विश्वस्त तसेच मानकरी बोलापूरकर महाराज, देहूकर महाराज, डावरे महाराज आदींच्या उपस्थितीत मानकरी, विणेकरी यांसह मान्यवरांचा नारळ, प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला.

"या सुरवाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी वारीसी आला" (सर्व छायाचित्रे – हेमंत घोरपडे)

दुपारी ३ च्या सुमारास संत निवृत्तिनाथ मंदिरात आरती होऊन चांदीच्या रथातून पालखी मार्गस्थ झाली. यावर्षी जवळपास ५० हजारांवर वारकऱ्यांनी विठूनामाचा गजर केला. सोहळ्याला पंचक्रोशीतील भाविकांनीही हजेरी लावत पालखीत सहभाग नोंदवला.

नाशिक : 'धन्य धन्य निवृत्ती देवा.. काय महिमा वर्णावा…' या अभंगाची प्रचिती देणारा आषाढी वारीचा पालखी सोहळा गुरुवारी (दि. २०) हजारो वारकऱ्यांनी 'याचि देही याची डोळा' अनुभवला. एकादशीनिमित्त निवृत्तिनाथ महाराज यांची पालखी दुपारी पंढरपूरकडे रवाना झाली. टाळ-मृदंगाच्या गजरात निघालेल्या पालखीने अवघी त्र्यंबकनगरी दुमदुमून गेली होती.

सुशोभित चांदीच्या रथात संत निवृत्तिनाथांच्या पादुका असलेली पालखी ठेवली होती. मंगलमय वाद्य आणि हरिनामाचा गजर, पालखी पुढे पदन्याय करणारा अश्व, असे भारावून टाकणारे वातावरण होते. नंदकुमार मोरे यांचे मंगल वाद्य लक्ष वेधून घेत होते. पालखी प्रस्थानास माजी नगराध्यक्ष सुनील अडसरे, बाळासाहेब अडसरे, अजय अडसरे यांची बैलजोडी जोडण्यात आली आहे. तसेच सचिन शिखरे यांची बैलजोडी सनई पथक घेऊन निघाली. तीर्थराज कुशावर्तावर पूजा झाली.

मनसे अध्यक्ष ठाकरेंचा सहभाग

यंदाच्या वारी प्रस्थान सोहळ्याला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवर्जून हजेरी लावली. दुपारी एकच्या सुमारास त्यांचे आगमन झाले. त्यांनी संत निवृत्तिनाथ महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतले. विश्वस्त मंडळाचा सत्कार घेत पालखी प्रस्थानाला शुभेच्छा देऊन त्यानंतर त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले.

त्र्यंबकेश्वर येथे पालखी प्रस्थानसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आले असता त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात भेट दिली. यावेळी विश्वस्त रुपाली भूतडा यांनी त्यांचा सत्कार केला.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT