पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी "ॐ नमः शिवाय" आणि "बम बम भोले"च्या गजरात शहरातील आस्थेचे ठिकाण असलेल्या श्री कपालेश्वर महादेवाच्या मंदिरासह गोदाघाटावरील व परिसरात पहाटेपासूनच भाविकांची अलोट गर्दी उसळली. पावसाच्या विश्रांतीमुळे भाविकांच्या उत्साहाला उधाण आले असून, प्रशासनातर्फे सुरक्षेचे आणि गर्दीचे कडक नियोजन करण्यात आले.
कपालेश्वर मंदिरात पहाटे चार वाजता पुजारी अजित गर्गे आणि अनिल भगवान गुरव, आनंद करकमकर यांच्या हस्ते दुग्धाभिषेक, जलाभिषेक आणि विशेष महापूजा करण्यात आली. दुपारी चार वाजता कपालेश्वराचा पंचमुखी मुखवटा मंदिरात आणून धार्मिक विधिवात पूजन करण्यात आले. त्यानंतर पारंपारिक पद्धतीने पालखी मिरवणूक काढण्यात आली.
शिवभक्तांनी बेलपत्र, फुले, तांदूळ आणि धैत्र्याचे फळ अर्पण करत दर्शन घेतले. पौराणिक कथेनुसार, महादेवाकडून ब्रह्महत्येचे पातक घडल्यानंतर नंदीनेच त्यांना या तीर्थक्षेत्री स्नानाचा मार्ग दाखवला होता. नंदीने गुरुसमान मार्गदर्शन केल्याने महादेवाने नंदीला आपल्यासमोर न बसता गुरुस्थान दिले.
कपालेश्वरासोबतच बाणेश्वर, तांबेश्वर, कपूरेश्वर, विश्वेश्वर, नीलकंठेश्वर, नारोशंकर, मुक्तेश्वर, तपोवनातील जनार्दनस्वामी आश्रम परिसरातील सर्वेश्वर आणि महामृत्युंजय मंदिर, हिरावाडीतील बेलेश्वर, नांदूर येथील नीलकंठेश्वर, मानूर येथील शिवगंगा आणि आडगाव, मखमलाबाद, म्हसरूळ शिवमंदिरांतही भाविकांनी गर्दी केली होती.
श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमीचा योग एकाच दिवशी आल्याने कपालेश्वर आणि सोमेश्वर मंदिरांसह शहरातील सर्व महादेव मंदिरांत भाविकांची गर्दी पाहावयास मिळाली. पहाटेपासूनच दर्शन, पूजा-अर्चा आणि अभिषेकासाठी शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांतून भाविक दाखल झाले होते.
'हर हर महादेव'च्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झाला होता. मखमलाबादला नागपंचमीनिमित्त भरलेल्या यात्रेला हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
सोमेश्वर मंदिरातही भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या.
दिवसभरात ५० हजारांहून अधिक भाविकांनी सोमेश्वराचे दर्शन घेतल्याची माहिती मंदिर व्यवस्थापनाचे मुख्य हरीश शिंदे यांनी दिली. दुपारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते आरती करण्यात आली. महिलांसाठी विनामूल्य आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर अशाप्रकारे संपूर्ण श्रावणमासानिमित्त विविध सामाजिक उपक्रम घेतले जाणार आहेत.
गर्दीचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी संस्थानातर्फे २५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवून लक्ष ठेवले जात आहे. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शनरांगा करण्यात आल्या असून, मंदिराकडे जाणारे रहदारीचे मार्ग बंद करण्यात आले आहेत.
"मंदिरात येऊ न शकणाऱ्या भक्तांसाठी प्रशासनाने ऑनलाईन दर्शनाची सोय केली असून, दुपारी ३ वाजेपर्यंत ५,०५७ हून अधिक भाविकांनी या सुविधेचा लाभ घेतला. गर्दी नियंत्रणासाठी पोलिस प्रशासन आणि भाविकांचे उत्तम सहकार्य लाभत आहे."— विलास पाटील, मुख्य प्रशासक, कपालेश्वर मंदिर संस्था