देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा
पळसे सोमय्यानगरजवळील कडवा पाटावरील पुलाजवळ होणाऱ्या अपघातांची मालिका थांबवा, अशी विनंती शिवसेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला करूनदेखील कोणतीही उपाययोजना न केल्याने या पुलाच्या एका बाजूचा भाग खचून गेल्याने प्रवासी वर्गाच्या जीवाला या पुलाने धोका निर्माण झाला आहे.
तर पुलाची तातडीने नव्याने निर्मिती करावी, अशी मागणी आता पंचक्रोशीतून होत आहे. नाशिक साखर कारखाना ते बंगाली बाबा रस्त्यावरील सोमय्यानगरजवळील कडवा पाटावर असलेला पूल अगदीच तिरपा आहे. या पुलावर सतत अपघात होत असून, अनेकांना रात्री झालेल्या अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे.
हा पूल सार्वजनिक पाटबंधारे विभागाने चुकीच्या पद्धतीने बांधलेला आहे. ९-१० वर्षांपूर्वी हा रस्ता बांधकाम विभागाकडे वर्ग झाला आहे. तातडीने त्याचे बांधकाम सरळ करून वाहनधारकांचा जीव वाचवावा, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता धनराज पालवे यांच्याकडे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील गायधनी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मार्च २०२५ ला केली होती. मात्र, एक वर्ष होत आले तरीही सदर मागणीकडे संबंधितांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पळसे, शिंदे, वडगाव पिंगळा, नानेगाव आदी गावांचा येणाऱ्या पावसाळ्यात तुटण्याची भीती आहे.
संपर्क सोमय्यानगरजवळील कडवा पाटावरील पुलाला मोठे वळण आहे. याठिकाणी तातडीने दक्षिण-उत्तर रस्त्याप्रमाणे सरळ रेषेत पुलाचे बांधकाम करावे. तसेच याच रस्त्यावरील सरोदे-गायखे मळ्याच्या शिवनाल्यावर नासाकाने बांधलेला हा पूल मोडकळीस आला असून, तेथे तातडीने नवीन पूल बांधावा, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील गायधनी, सरपंच शोभा गायधनी, भाऊसाहेब गायधनी, नवनाथ गायधनी, किरण नरवडे, समाधान गायखे, नंदू नरवाडे आदींनी केली आहे.